Breaking News
अपात्रतेबाबत म्हणणे मांडण्यासाठी 7 दिवसांची मुदत
मुंबई ः गेले वर्षभर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यात आता पावसाळी अधिवेशन सुरु होणार असल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याकामी गती दिली आहे. त्यांनी शिंदे सेनेच्या 40 आमदारांना तसेच ठाकरे गटाच्या 14 आमदारांनाही म्हणणं मांडण्यासाठी नोटीस पाठवली आहे. म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
भारतीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत आपल्याला मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 शिवसेना आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर लवकरच सुनावणी सुरू होणार आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची प्रत मागितली होती. आमच्या कार्यालयाला गेल्या आठवड्यात ती मिळाली आहे. त्यामुळे आता आम्ही सुनावणी सुरू करू, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे.
अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर आपली भूमिका घेण्याअगोदर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील कामकाजाला वेग दिला आहे. ठाकरे गटातून शिंदेंकडे गेलेल्या शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. विधान सभा अध्यक्षांनी विशिष्ट वेळेत याचिका निकाली काढणं बंधनकारक आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांचं भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे यावर आता विधान सभा अध्यक्ष काय निर्णय घेतात त्यावर संबंधित आमदारांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai