Breaking News
1 जुलैपासून विलंब दंड लागू
नवी मुंबई ः महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने सन 2025-26 या चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीमध्ये 366.80 कोटींचे करसंकलन करून करसंकलनामध्ये महापालिकेच्या इतिहासामध्ये विक्रमी नोंद केली आहे. नवी मुंबई महापालिकेने नागरिकाभिमुख उपक्रम राबविल्यामुळे व करसंकलनासाठी विविध पुढाकार घेतल्याने संकलनामध्ये विक्रमी वाढ झाली असून यामध्ये बचतगटांच्या महिला, मालमत्ताकर विभागाचे सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचारी आणि सर्वात महत्वाचे शहरातील जागरुक करदाते यांच्यामुळे करसंकलनाचा हा विक्रम साध्य झाला असून हे सर्वांचे यश असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले असून करदात्या नागरिकांचे आभार मानले आहेत.
सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता करवसुलीचे 1200 कोटी रुपयांचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी महानगरपालिकेने नियोजनबद्ध पावले उचलली आहेत. चालू वर्षात बचतगटांच्या महिलांद्वारे बिलांचे घरपोच वाटप, मोबाईल ॲप्लिकेशनच्या साहाय्याने मालमत्ताधारकांच्या माहितीचे संकलन व अद्ययावतीकरण, मालमत्ताकर भरण्यासाठी डिजिटल पद्धतीचा स्वीकार, मालमत्ताकर बिल व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि मालमत्ताकर बिलातील सामान्य करावरील 10% सवलत योजनेचा लाभ असे अभिनव उपक्रम राबवण्यात आले आहेत.त्यासोबतच, करसंकलनामध्ये वृध्दी होण्यासाठी चालू वर्षी डेटा विश्लेषण, मालमत्ताधारकांच्या माहितीचे अद्ययावतीकरण व माहितीच्या आधारे प्रभावी जनजागृतीकरिता फॉक्सबेरी टेक्नोलॉजी.प्रा.लि यांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्याद्वारे करण्यात आलेले विश्लेषण, करसंकलन अभियानाचे नियोजन, माहिती संकलनासाठी मोबाईल ॲप्लिकेशनची निर्मिती या बाबींनी करसंकलनामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. आगामी काळामध्ये थकबाकीदारांना मालमत्ताकर भरण्याच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी महापालिकेने 1 जुलैपासून विलंब दंड (शास्ती) लागू करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार, ज्यांनी पहिल्या तिमाहीमध्ये आपल्या कराचा भरणा केला नाही अशा थकबाकीदारांवर 1 जुलैपासून प्रतिमहिना वाढणारा 2% विलंब दंड आकारण्यास सुरुवात होणार आहे.
शहराच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाचा वेळेवर भरलेला कर हा विश्वासाचा भाग आहे. पहिल्या तिमाहीत झालेल्या विक्रमी करसंकलनातून नवी मुंबईकरांनी दाखवलेली जबाबदारी निश्चितच उल्लेखनीय आहे. मात्र आता नियमानुसार 1 जुलैपासून विलंब दंड लागू होत आहे. त्यामुळे अनावश्यक दंड टाळण्यासाठी नागरिकांनी तात्काळ कर भरून विकासाच्या वाटचालीत भागीदार व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
असा आला कर !
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai