Breaking News
महाराष्ट्रात दसर्याला जितकं धार्मिक महत्व आहे, तितकंच त्याला राजकीय महत्वही आहे. शिवतीर्थावर सेनेचा, भगवानगडावरील मुंडेंचा तर आरएसएसचा नागपूरमधील मेळावा यातून पुढची वैचारिक दिशा कार्यकर्त्यांना मिळते म्हणून या तिन्ही राजकीय मेळाव्यांना महत्व आहे. शिवसेनेत बाळासाहेबांनंतर उद्धव यांनी शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परंपरा सुरू ठेवली. दोन वर्षं कोरोनामुळे राज्यात कोणताच राजकीय मेळावा झाला नाही. त्यामुळे या मेळाव्यांना महत्व होतं. त्यातच शिवसेनेत ङ्गूट पडल्याने शिंदे गट आणि ठाकरे गटाचे दोन वेगळे भव्य मेळावे होण्याअगोदरच त्यांची चर्चा रंगली होती. मुंबई महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने या मेळाव्यांमधून काय संदेश मिळणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती; परंतु दोन्ही गटांच्या मेळाव्यातली भाषणं पाहिली तर ‘दसरा सण मोठा नाही टोमण्यांना तोटा’ असेच म्हणावे लागेल.
मुख्यमंत्री शिंदे यांनी सेनेच्या चाळीस आमदारांना घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेचे अनेक नेते, आमदार, खासदार शिंदेंसोबत जात राहिले. शिवसेनेवर एकामागून एक आघात होत असताना दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करणे ठाकरे यांना आवश्यक होतं. शिंदे गटानेही शक्तीप्रदर्शन केलं; परंतु शिंदे यांचं भाषण सुरू होण्याआधी काही कार्यकर्ते मैदान सोडून गेले. याचा अर्थ कार्यकर्त्यांनी जीवाची मुंबई केली; परंतु आपल्या नेत्याच्या भाषणातील वैचारिक सोनं लुटलं नाही. उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकून त्यावर भाष्य करण्याची वाट पाहणं शिंदे यांच्या गटाला ङ्गारसं आवडलेलं दिसत नाही. शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर दुकानं बंद, व्यवहार बंद ठेवल्याचा आरोप केला; परंतु ते ज्यांच्यासोबत सत्तेत आहेत, त्या भाजपच्या केंद्र सरकारनेच घालून दिलेल्या निर्देशांचं पालन राज्य सरकार करत होतं आणि त्या सरकारचा शिंदे हे ही एक भाग होते, हे ते विसरले असले तरी जनता विसरली नाही. त्यामुळे त्यांच्या भाषणानंतर समाजमाध्यमांमध्ये उमटलेल्या प्रतिक्रिया कशाचं द्योतक आहेत, हे लक्षात येईल.
ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात नवीन काहीच नव्हतं, हे खरं आहे; परंतु भाजपसह शिंदे गटाचा समाचार घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या बाहुत स्ङ्गुरण आणण्याचा प्रयत्न केला. नेहमीप्रमाणेच ते कार्यकर्त्यांना दिशा देण्यात कमी पडले, हे खरं आहे. ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांना सारखं टीकेला आणि समीक्षेला सामोरं जावं लागत आहे, त्यावर बोलताना काँग्रेसबरोबर जाऊन आपण हिंदुत्व वाढवलं असल्याचा दावा करून त्यांनी विरोधकांच्या हातात आयतं कोलित दिलं. उद्धव हे आजारी आहेत आणि त्यांना अभिवादन करतानाही त्रास झाला, हे शिवसैनिकांना दिसलं. स्वतः आणि पक्ष मजबूत आहे हे सांगताना पुढेही तसाच रहावा हे यासाठी कार्यकर्त्यांना कार्यक्रम द्यावा लागतो; तो देण्यात मात्र ठाकरे यशस्वी झाले नाहीत. शिवसेना राज्यात न वाढण्याचे हे मोठे कारण आहे. राज्यातून आलेले कार्यकर्ते आणि माध्यमांमध्ये दसरा मेळाव्याला सर्वांधिक प्रसिद्धी मिळत असताना ठाकरे यांनी आयती आलेली संधी गमावली.
सेनेसाठी मुंबई महापालिकेतील सत्ता हा प्राण आहे, हे सांगण्यासाठी राजकीय पंडितांची गरज नाही. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठोस अजेंडा मांडण्याची संधी उद्धव यांना होती; पण त्यांनी मुंबईच्या मुद्द्यांना हात घालणं टाळलं. हेच शिंदेंंच्या बाबतीत घडलं. दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात एकमेकांना टोमणेच मारले. गद्दारीच्या जखमेतून उद्धव अजून बाहेर आलेले नाहीत. शिंदे यांच्या मेळाव्याला जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे आणि निहार ठाकरे या ठाकरे कुटुंबातल्या तीन सदस्यांनी हजेरी लावली. उद्धव सोडून बाळासाहेबांचे इतर कुटुंबीय आपल्याबरोबर असल्याचा दावा शिंदे यांना यानिमित्ताने करता आला. याआधीच त्यांनी राज यांची भेट घेतली होती. परंतु जयदेव यांना राजकारणात किती महत्त्व द्यावं किंवा गांभीर्यानं घ्यावं हादेखील प्रश्न आहे. अशा परिस्थितीत शिंदे यांच्या मेळाव्याला उपस्थित राहिलेले ठाकरे घराण्याचे सदस्य हे बाळासाहेब यांचे राजकीय वारसदार नाहीत, हे बिंबवण्याची संधी उद्धव यांनी गमावली. कारण जयदेव ठाकरे यांचं या एकनाथाला एकटं पडू देऊ नका, हे वाक्य भविष्यात शिंदे गटाकडून निवडणुकांमध्ये वापरलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपल्या भाषणात त्यांनी विनाकारण शिंदेंच्या दिड वर्षाच्या नातवाला ओढले. वास्तविक, असा नातवाचा उल्लेख किंवा अशा एखाद्या मुद्द्यावर जास्त भर देणं ठाकरेंसाठी गरजेचं नव्हतं. अशाच काही जुन्या, शिळोप्याच्या मुद्द्यांचा आधार त्यांनी घेतला. हाच धागा पडकून शिंदे यांनी उद्धव यांच्या टीकेचा समाचार घेतला. मुख्यमंत्री झाल्यावर व बंडानंतरचा हा पहिला मेळावा होता. उद्धव यांचं भाषण संपण्यासाठी थोडा अवधी बाकी असताना शिंदे यांनी भाषण करणं हा नियोजनाचा भाग असू शकतो. मोदींप्रमाणे संधीचा लाभ घेण्यात शिंदे यशस्वी झाले. भाषणादरम्यान ‘पीएङ्गआय’वर केंद्राने कारवाई केली; पण त्याबद्दल ठाकरे काही बोलले नाहीत असा आरोप शिंदेंनी केला. वस्तुतः सेनेच्या मुखपत्रातून ‘पीएङ्गआय’वरील कारवाईचं स्वागत करण्यात आलं होतं. ठाकरे यांनी शिंदे गटावर, बाप चोरणारी टोळी आली, अशी टीका केली होती. तिला शिंदे यांनी, ‘तुम्ही बापाचे विचार विकण्याचा प्रयत्न केला’ असं आम्ही म्हणावं काय? ‘बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री होती; पण ते कधीही त्यांच्यासोबत गेले नाहीत. तुम्ही का गेलात?’ असं शिंदे यांनी विचारलं.
काश्मीरमधील कलम 370 हटवून आणि राममंदिराचं बांधकाम सुरु करुन बाळासाहेबांचे स्वप्न मोदींनी पुर्ण केल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला. उद्धव यांनी शिंदे यांचा उल्लेख कटाप्पा म्हणजेच कट करणारा असा केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे यांनी कटप्पा हा प्रामाणिक होता दुटप्पी नव्हता, असं सांगितलं. ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांची उणीदुणी काढण्यासाठी मेळाव्यांचा वापर केला. शक्तीप्रदर्शन करण्यात दोन्ही गट यशस्वी झाले; परंतु त्यातून विचारांचे सोने कार्यकर्त्यांना लुटता आले नाही. वास्तविक पाहता दोन्ही गट आपण जनसामान्यांसाठी येत्या काळात कोणत्या योजना राबवू इच्छितो, गेल्या काही काळात कोणते निर्णय घेतले, त्याचा कितपत ङ्गायदा होतोय याबद्दल बोलले असते तर दोन्ही गटांच्या विचारांची आणि कार्यतत्पर राहण्याबाबतची शैली समोर आली असती. ठाकरे व शिंदे आपण घेतलेल्या निर्णयांचा, केलेल्या कामांचा राज्याला कसा ङ्गायदा झाला हे सांगून भविष्यातल्या नियोजनाची दिशा स्पष्ट करु शकले असते. पण असं काहीच घडलं नाही. एकमेकांची धुणी धुण्यातच या नेत्यांचा वेळ गेला. सामान्यांची करमणूक झाली असेल; त्यामुळे या दोन्ही मेळाव्यांचे वर्णन ‘दसरा सण मोठा.. टोमण्यांना नाही तोटा’ असेच करावे लागेल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे