Breaking News
राज ठाकरे यांचा प्रवास भारतीय विद्यार्थी सेनेतून सुरु होऊन आज एका स्वतंत्र पक्षाच्या अध्यक्षपर्यंत झाला. बाळासाहेब ठाकरे यांची छबी, तीच बोलण्याची लकब आणि तसाच आवाज यामुळे त्यांना अल्पावधीत शिवसेनेत मानाचे स्थान मिळाले. बाळासाहेबांसारखी त्यांच्याकडेहि वक्तृत्वाबरोबरच व्यंगचित्र काढण्याची कला आहे. राज्यात 95 साली शिवसेनेची सत्ता आल्यावर त्यांच्या स्वप्नांना घुमरे फुटले. बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी शिवउद्योग सेनेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी मायकल जॅक्सनचा शो करून कोट्यावधी रुपये उभे केल्याचे बोलले जाते. परंतु पुढे या शिवउद्योग सेनेचे काय झाले? किती जणांना रोजगार मिळाला? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. त्यानंतर बाळासाहेबांचा फोटो अल्बम काढला व गेट वे ऑफ इंडिया जवळ मोठा कार्यक्रम केला. या सर्व कार्यक्रमातून त्यांच्याकडे असलेले संघटना बांधण्याचे कसब सर्वांना दिसले पण एक परिपक्व राजकीय नेता म्हणून आपली छबी बनवण्यास ते अपयशी ठरले. या अपयशाच्या जोखडात ते आजही अडकले आहेत. अचानक एखाद्यावेळी अवसानघातकी निर्णय घेऊन स्वतःसह पक्षाला अडचणीत टाकण्याचा त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही. किणी प्रकरणात शिवसेनाप्रमुखांना प्रचंड मनस्ताप झाला आणि मोठ्या दिव्यातून जावे लागले यावरूनच बाळासाहेबांनी राजकीय वारसाबाबत पुढचा निर्णय घेतला असावा.
शिवसेनेत असताना आपल्याला हवा तसा भोंगा वाजवायला मिळत नाही म्हणून सेनेपासून फारकत घेत मनाप्रमाणे कारभार करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. शिवतीर्थावर झालेल्या स्थापना दिवशीच्या सभेत महाराष्ट्रातील जनतेला विकासाच्या ब्लू-प्रिंटचा भोंगा असा काही जोरात वाजवून दाखवला की जनतेने भरभरून मतांचा प्रसाद त्यांच्या झोळीत टाकला. ज्या शिवसेनेला आपला पहिला आमदार निवडून आणायला वीस वर्ष खर्च घालावी लागली त्यातुलनेत राज साहेबांच्या भोंग्याला महाराष्ट्राने दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व म्हणावा लागेल. पाहिल्या झटक्यात बारा आमदार निवडून आले. महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांचा भोंगा या आमदारांच्या सहाय्याने ते विधानसभेत वाजवून सरकारला सळो की पळो करून सोडतील अशी अपेक्षा जनतेला होती. परंतु त्यांच्या आमदारांचा भोंगा विधानसभेत गरजलाच नाही. त्यानंतर त्यांनी राज्यात वसूल केल्या जाणार्या टोल विरोधात मोठा आवाज उठवला. टोलनाक्यावर मनसैनिकांनी चौक्यापहारे बसवून गाड्यांचा तपशील जमवून तो राजगडावर दिला. पुढे या तपशिलाचे काय झाले? त्याच्याबद्दल ना कधी राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले ना आंदोलन केले. अर्धवट सोडलेल्या या आंदोलनाने त्यांच्या पदरी फक्त बदनामी पडली आणि ‘टोल का झोल’ हा नवा शब्द मराठी शब्दकोशात जन्माला आला.
2014 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी गुजरात दौर्यानंतर त्यांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळायला सुरुवात केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर देशातील राज्यकर्त्यांना मोदींचे पाय धुऊन पाणी प्या असा अनाहूत सल्ला पण दिला. पुढे याच भूमीकेत बदल करत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडिओ’ असे सांगत मोदीं सरकार विरोधात वेगळी भूमिका घेतली. त्यांच्या या सतत बदलणार्या भूमिकांमुळे त्यांना राजकीय अस्पृश्यता लाभली. मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी पक्ष स्थापन जरी केला असला तरी शिवसेनेचे नुकसान व्हावे म्हणून आणि इतर पक्षांच्या भल्यासाठी प्रत्येक निवडणुकीत मनसेचे उमेदवार सेनेच्या विरोधात उभे केल्याने त्यांच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. ज्या शरद पवारांच्या विरोधात शेकडो प्रचार सभा घेतल्या त्याच पवारांची पुण्यात मुलाखत घेऊन आपणासही राजकारणात कोणीही अस्पृश्य नाही हे दाखवले. बाळासाहेबांनी कधीच तत्वांशी आणि विचारांशी तडजोड केली नाही. मराठी माणूस राष्ट्रपतीपदी बसणार म्हणून भाजपाला पाठिंबा न देता काँग्रेसला दिला. आपल्या निर्णयाशी ते ठाम राहिले. पण राज यांच्या धरसोड वृत्तीमुळे मोठी राजकीय किंमत त्यांनी आतापर्यंत मोजली आहे. याउलट उद्धव यांनी बाळासाहेबांनंतर संयमाने सेना सांभाळली, भाजपचा सेनेला असलेला धोका वेळीच ओळखून युती तोडली आणि आघाडी करून शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला. यालाच राजकीय परिपक्वता आणि चाणाक्षपणा म्हणतात. त्यामुळे बाळासाहेबांचा उद्धव बाबतीत निर्णय किती शहाणपणाचा होता ते जाणवते.
कोहिनुर मिल विकत घेतल्याचे प्रकरण केंद्राने बाहेर काढून राज ठाकरे यांच्या भोंग्याचा आवाज कमी केला. कोहिनुर व्यवहाराबाबत एक ईडीचे समन्स आले आणि राज यांचा नूरच पालटला. देशात मतांच्या ध्रुवीकरणासाठी भाजप हिंदुत्वाचे कार्ड खेळत असल्याचे पाहून त्यांनीही मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्याला हवा दिली. खरंतर महागाई, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव, एसटी कामगार आणि शेतकर्यांच्या प्रश्नावर त्यांनी मोठे आंदोलन उभारून तरुणांना रस्त्यावर उतरवायला हवे होते. त्यामुळे उद्धव सरकार आंदोलनाला ना विरोध करू शकले असते ना पाठिंबा देऊ शकले असते. महाविकास आघाडीला कात्रीत पकडून स्वतःचा खुंटा बळकट करण्याऐवजी ते भाजपचा खुंटा घट्ट करायला गेले. आणि मशिदीवरील भोंग्यांचा विषय घेऊन उद्धव ठाकरेंना विरोध करण्याच्या नादात स्वतःच गोत्यात आले. प्रक्षोभक भाषण केले म्हणून स्वतःवर गुन्हा नोंदवून घेतलाच शिवाय मृत्युपंथाला गेलेल्या केसेसना संजीवनी दिली. शेवटी काय झाले तर स्वतः पोलिसांच्या नजरकैदेत, कार्यकर्ते तुरुंगात, आणि आंदोलनाचा बार फुसका. त्यातच उत्तरप्रदेशात जाऊन राममंदिराचे दर्शन घेण्याचे जाहीर केले. या दौर्यालाही भाजप खासदाराने विरोध करून आधी उत्तरप्रदेशातील लोकांची माफी मागण्याची शर्थ ठेवल्याने तो दौराही अडचणीत आला आहे. राज ठाकरे यांची अवस्था राजकीय कुरूक्षेत्रातील चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूप्रमाणे झाली असून त्याचा भेद ते कसा करतात यावरच भविष्यातील मनसेचा खळ-खट्याकचा खेळ अवलंबून असेल हे निश्चित.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे