‘ठाणेदारा’च्या समृध्दीसाठी महापालिकेची उधळपट्टी
- by Aajchi Navi Mumbai
- May 20, 2022
- 1280
‘विपुल’ दडपणाने 361 कोटींच्या कामासाठी आयुक्तांचे ‘कदम’
नवी मुंबई ः पामबीच मार्गावर महात्मा फुले जंक्शन ते कोपरी पर्यंत बांधण्यात येणारा उड्डाणपुल वादात सापडला आहे. पोलीसांच्या वाहतुक विभागाचा अभिप्राय डावलून 361 कोटी रुपयांचा पुल बांधण्याचा घेतलेला निर्णय आयुक्त अभिजीत बांगर व शहर अभियंता संजय देसाई यांच्या अंगलट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणेदाराकडून ‘विपुल’ दडपण आल्याने हे अनावश्यक ‘कदम’ आयुक्तांनी उचलल्याने नवी मुंबईकरांनी संताप व्यक्त केला आहे. शासनाकडे तक्रार करुन या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्याची तयारी अनेक संघटनांनी सुरु केल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्यावतीने महात्मा फुले जंक्शन ते कोपरी पर्यंत 361 कोटींचा पुल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. सुरुवातीला कोपरी जंक्शन जवळील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी छोटा उड्डाणपुल बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्याचा पालिकेचा मनसुबा होता. परंतु, तत्कालीन शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी त्यांना मुदतवाढ मिळेल या आशेने ठाणेकरांना खुश करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने या पुलाचे बांधकाम करण्यात येणार असून त्याची आवश्यकता होती का? असा सवाल आता विचारला जावू लागला आहे.
पामबीच मार्गावरील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी या पुलाची निर्मिती केली जात असल्याचे सांगण्यात येत असले तरी या मार्गावर गेल्या 15 वर्षात कधीही वाहतुक कोंडी झाली नसल्याचा अनुभव नवी मुंबईकरांचा आहे. या पुलाऐवजी घणसोली ते ऐरोली हे काम प्राधान्याने हाती घेतल्यास ठाणे-बेलापुर मार्गाला पर्यायी मार्ग उपलब्ध होईल जेणेकरुन वाहतुक कोंडी कमी होईल अशी मागणी असताना शहर अभियंता विभागाने हाती घेतलेल्या या कामाच्या गौडबंगालाची चर्चा सर्वत्र आहे.
राज्यातील एका मंत्र्यांच्या मुलाच्या मेहुण्याला हे काम मिळावे म्हणून पालिका आयुक्त व शहर अभियंता यांच्यावर विपुल दबाव टाकल्याने हे कदम उचलले गेल्याची चर्चा आहे. या पुलाच्या निर्मितीसाठी 384 झाडांचे पुर्नेरोपण करण्याचा प्रस्ताव प्रसिद्ध झाल्याने नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. समाज माध्यमांवर याबाबत जनजागृतीसाठी अनेक संदेश फिरत असून याबाबत आंदोलन उभे करण्याची तयारी नवी मुंबईत सुरु झाली आहे. अनेक पर्यावरणप्रेमींनी झाडांच्या संवर्धनासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेण्याची तयारी सुरु केली आहे. पर्यावरण मंत्री याबाबत कोणता निर्णय घेतात याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
- जोरू का भाई एक तरफ...
राज्यातील मंत्रीमंडळात महत्वाचे खाते सांभाळणार्या मंत्र्याच्या मुलाच्या मेहुण्यासाठी हा ‘विपुल’ खटाटोप सुरू असल्याची चर्चा पालिकेत आहे. ‘विपुल’ खटाटोपातून या जोरूच्या भाईला एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि ठाणे महानगरपालिकेत मोठमोठी कामे देण्यात आल्याची चर्चा राज्यात आहे. 361 कोटींचे हे काम याच माध्यमातून देण्यात आले असून त्यासाठी पालिका आयुक्त व शहर अभियंता यांच्यावर दडपण आणून त्यांना हे ‘कदम’ उचलण्यास भाग पाडण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ‘सारी खुदाई एक तरफ और जोरूका भाई एक तरफ’ या म्हणीचा प्रत्यय नवी मुंबईकरांना आला आहे. - आयुक्त साहेब हे वागणं बरं नव्हं!
पालिका उपायुक्त जयदीप पवार यांनी उड्डाणपुलामुळे बाधित वृक्षांच्या स्थलांतरासाठी जाहिरात स्थानिक वृत्तपत्रात तसेच स्थलांतरीत करण्यात येणार्या झाडांवर प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीमध्ये सुचना व हरकती सादर करण्याचा कालावधी नमुद नव्हता. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेऊन हरकतींसाठी एक महिन्याचा कालावधी नागरिकांना नवीन नोटीसीद्वारे दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने वृक्ष- प्राधिकरणावर तज्ज्ञ लोकांची नेमणुक करणे गरजेचे असताना आयुक्त बांगर यांनी अजुनपर्यंत कोणाचीही नेमणुक न केल्याने पर्यावरण प्रेमींनी आयुक्तांचे हे वागणे बरं नव्हं अशी प्रतिक्रिया दिली आहे. - 4जी संपर्क क्षेत्राबाहेर!
नवी मुंबईकरांच्या पैशाची दिवसाढवळ्या उधळपट्टी सुरु असताना नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून मिरवणार्या गणेश नाईकांच्या चुप्पीने शहरवासीयांची अस्वस्थता वाढली आहे. माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक व माजी महापौर सागर नाईक यांच्याही प्रतिक्रिया न आल्याने नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात 4जी म्हणून ओळखले जाणारे ऑफलाईन झाल्याने प्रकरणातील गुढता वाढली आहे. - विभाग अधिकार्यांची भुमिका संशयास्पद
सदर कामाचे काँक्रिट तयार करण्यासाठी लागणारी जागा ही तुर्भेतील मलनिस्सारण प्रकल्पात देण्यात येणार होती. हे काम वृक्षप्राधिकरणाच्या निर्णयानंतरच सुरु करण्याची अट असताना तुर्भ्याचे विभाग अधिकारी यांनी संबंधित कंपनीला काँक्रिट प्लन्ट उभारण्यासाठी परवानगी दिल्याचे बोलले जाते. ही परवानगी आयुक्त आणि शहर अभियंता यांना अंधारात ठेवून दिल्याचे बोलले जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai