Breaking News
मोठया उत्साहात मच्छिमार सोसायटीचे उदघाटन
उरण ः कोकण किनारपट्टीवर मच्छिमार व्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांची वस्ती मोठया प्रमाणात आहे. मासेमारी हा एकमेव त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. मात्र समुद्र परिसरात अतिक्रमण झाल्याने मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळू लागली आहे.पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांचे, व्यवसायिकांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी व शासनाच्या विविध सेवा, सवलती, योजनांचा लाभ घेण्यासाठी, त्यांचे अधिकार व हक्क त्यांना मिळवून देण्याच्या उद्देशाने उरण शहरातील कोळीवाडा येथे 8 डिसेंबर 2024 रोजी उरण कोळीवाडा पारंपारिक मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित या मच्छिमार सोसायटीचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात करण्यात आले.
मच्छिमार करून कोळी बांधव आपली उपजीविका करतात. मासेमारी हे एकमेव उपजीविकेचे साधन कोळी समाज बांधवांचे आहे. मात्र काही वर्षात समुद्र किनारी भारत सरकारचे तसेच महाराष्ट्र सरकारचे अनेक प्रकल्प,रासायनिक कंपन्या, उपक्रम आल्याने समुद्र किनारी राहणाऱ्या कोळी बांधवांच्या जमिनीवर मोठया प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. विविध खाजगी व शासकीय प्रकल्पामुळे कोळी बांधवांवर अनेक मोठया प्रमाणात अत्याचार झाले आहे. शासन दरबारीसुद्धा कोळी बांधवांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे उरण कोळीवाडा पारंपारिक मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित या मच्छिमार सोसायटीचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात करण्यात आले. यावेळी मच्छिमार नेते रमेश कोळी, फादर मार्शल लोपेझ, मच्छिमार नेते रामदास कोळी, सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण प्रेमी नंदकुमार पवार, प्राची कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम वाजत गाजत मिरवणूक काढून मंदिर व प्रार्थना स्थळांना भेट देऊन आशीर्वाद घेउन कार्यक्रम स्थळी सदर सोसायटीच्या ऑफिसचे व सोसायटीच्या नामफलकाचे उदघाटन मच्छिमार नेते रमेश कोळी, सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण प्रेमी नंदकुमार पवार, फादर मार्शल लोपेझ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. यावेळी उपस्थित कोळी बांधव, मच्छिमार करणाऱ्या मच्छिमार बांधवांना व्यासपीठावरील मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मच्छिमारांचे नेते रमेश कोळी यांनी सांगितले की 2005 पासून कोळी बांधवांनी मच्छिमारांच्या समस्या सोडविण्यास सुरवात केली. शासन दरबारी मच्छिमारांच्या प्रती मोठया प्रमाणात उदासीनता आहे. शासनाला मच्छिमारांचे प्रश्न सोडवायचेच नाही. त्यामुळे शासन मच्छिमारांच्या समस्यांकडे नेहमी दुर्लक्ष करीत आलेला आहे. मात्र सोसायटी स्थापन करून तसेच संघटना स्थापन करून मच्छिमारांच्या प्रलंबित विविध समस्यांवर आवाज उठविण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणीही स्वतःला कमी समजू नये. आम्ही तुमच्या सोबत आहोत. शासनाच्या विविध सेवा योजणांचा, सवलतींचा लाभ घ्या असे आवाहन रमेश कोळी यांनी सर्वांना केले. सोसायटीच्या उदघाटन प्रसंगी कोळी बांधव, मासेमारी करणारे व्यावसायिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. नव्याने सोसायटीची स्थापना झाल्याने मच्छिमारांच्या समस्या, प्रश्न सुटण्यास हातभार लागणार असल्याने मच्छिमार बांधवांनी समाधान व्यक्त केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai