प्रभाग रचनेत हेराफेरीचा गणेश नाईक यांचा आरोप
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 26, 2021
- 822
सत्ताधारी-अधिकार्यांचे साटेलोटे
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना करताना राज्यातील सत्ताधार्यांनी पालिकेच्या अधिकार्यांना हाताशी धरून भाजपचे वर्चस्व असलेल्या प्रभागांचे विभाजन करून ते अन्य प्रभागाला जोडण्याचा प्रताप केल्याचा घणाघाती आरोप माजी मंत्री विद्यमान आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. आपण पालिकेच्या या अधिकार्यांची नावे योग्यवेळी उघड करू आणि त्यांच्या कार्याचा योग्य वेळी सत्कार करू असा इशारा त्यांनी दिल्याने पालिकेच्या अधिकार्यांत घबराट पसरली आहे.
कोराना संक्रमणाची लाट आता ओसरत असल्याने राज्यात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. गेले वर्षभर प्रलंबित असलेली नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लवकर व्हावी म्हणून देव पाण्यात ठेवून बसलेल्या राज्यकर्त्यांचे मनोरथ लवकरच पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने नवी मुंबई महानगरपालिकेला 18 नोव्हेंबरपर्यंत नवीन प्रभाग रचना करून त्याचे प्रारूप मंजुरीसाठी पाठवण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने त्री-सदस्यीय प्रभाग रचना करून ती मंजुरीसाठी 24 नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. यापूर्वी 2019 साली नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेने घ्यावी अशी अधिसूचना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढली होती. परंतु त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने या रचनेत बदल करत पुन्हा एक सदस्य निवडणूक प्रभाग रचना स्वीकारत निवडणुका घेण्याचे जाहीर केले. त्या अनुषंगाने पालिकेच्या निवडणूक अधिकार्यांनी नव्याने प्रभाग रचना करून मंजुरीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली. त्या प्रभाग रचनेला तसेच प्रभागांवर टाकण्यात आलेल्या आरक्षणाला माजी नगरसेवक मनोहर मढवी यांनी आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयातही दाद मागितली होती. दरम्यानच्या काळात कोरोना संक्रमणामुळे राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. आता कोरोना संक्रमणाचे सावट ओसरल्याने नव्याने निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यानुसार नवीन मतदार यादी तयार करून त्या प्रसिद्ध करण्यासाठी 5 जानेवारी ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. पालिकेने बनवलेल्या नवीन प्रभाग रचनेवर माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांनी गंभीर आक्षेप घेतले आहे आहेत. भाजपचे वर्चस्व कमी करावे आणि त्यांच्या कमी जागा निवडून याव्यात यादृष्टीने ही प्रभाग रचना केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपाचे वर्चस्व असलेल्या प्रभागाचे विभाजन करून ते नवीन प्रभागाना जोडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत आपण राज्य निवडणूक आयुक्त मदान यांच्याशी बोलल्याचे त्यांनी सांगितले. राज्यसरकारच्या सांगण्यावरून प्रभाग रचना करणार्या अधिकार्यांची नावे आपण योग्य वेळी समोर आणू आणि त्यांचा योग्य तो सत्कार करू असा इशारा दिल्याने संबंधित अधिकार्यांची पाचावरधारण बसल्याचे बोलले जात आहे. नाईकांच्या या आरोपामुळे निवडणुकीपूर्वीच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्याने भविष्यात होणारा निवडणूक किती चुरशीची असेल याचे संकेत मिळू लागले आहेत. दरम्यान नाईकांच्या या आरोपांचे विरोधकांनी खंडन केले असून नाईकांनी यापूर्वी स्वतः असे प्रताप करून अनेक विरोधकांचा काटा काढल्याचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी सांगितले.
- विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात नवी मुंबईतील मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार होत असून नाव एकाचे आणि छायाचित्र दुसर्याचे लावले जात आहे. या विरोधात आमदार गणेश नाईक यांनी राज्याच्या निवडणुक आयोगाकडे 19 नोव्हेंबर 2021 रोजी तक्रार केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai