Breaking News
सात वर्षांनी भरली उरणची आमसभा
उरण ःनागरिकांच्या विविध समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी दरवष आमसभेचे आयोजन केले जाते. मात्र उरण तालुक्यात 2018 नंतर एकदाही आमसभा घेण्यात आली नाही. मात्र जनतेच्या मनाचा कौल घेत उरण पंचायत समिती तर्फे 28 फेब्रुवारी रोजी जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध प्रश्नांवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली. आमदार महेश बालदी यांनीही नागरिकांना प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
जनतेने वारंवार केलेल्या मागणीमुळे नागरिकांचे वेगवेगळे प्रलंबित प्रश्न, विविध प्रकल्प, विविध कामांना होणारा उशिर, विविध प्रकल्प राबविण्यात येणारे अडथळे, शासकीय सेवा योजना राबविताना येणाऱ्या अडचणी आदी समस्या लक्षात घेता 2018 नंतर पहिल्यांदाच शुक्रवारी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल, टावूनशिप, उरण येथे आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार महेश बालदी, तहसीलदार उद्धव कदम, गटविकास अधिकारी समीर वठारकर, उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव, सहाय्यक पोलीस उपायुक्त न्हावा शेवा बंदर डॉ. विशाल नेहूल, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, गट शिक्षणाधिकारी प्रियांका म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख नरेश पवार, वाहतूक विभागाचे प्रमुख अतुल दहिफळे यांच्यासह विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी, प्रमुख यावेळी उपस्थित होते.
पाणीपुरवठा, खार बांधिस्ती, रस्त्यावर पडलेले खड्डे, रस्त्याचे निकृष्ट बांधकाम, जलजीवन मिशन, अपुरी कामे, भ्रष्टाचार, अवैध पार्किंग, अतिक्रमण, मुख्य रस्त्यावर सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, स्ट्रीट लाईट लावणे, शाळा, रोजगार, रुग्णालये, कॉलेज, परिवहन अशा अनेक समस्यांचा पाढा उरणकरांनी वाचला. उरण तालुक्यातील 32 गावाचा समावेश असलेला महानगर प्रकल्प रद्द करावा, कोणताही प्रकल्प राबविताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे, विरार अलिबाग कॉरीडोर प्रकल्प रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आळी. विविध नागरिकांनी आपले प्रश्न अनेक प्रश्न, समस्या आमसभेत उपस्थित केले. त्याचप्रमाणे बेशिस्त अधिकारी व भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या आमसभेत अनेक नागरिकांना प्रशासकीय अधिकाऱ्यांकडुन समाधान कारक उत्तरे न मिळाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या विविध समस्यांची, प्रश्नांची दखल घेत आमदार महेश बालदी तसेच विविध विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
या आमसभेला सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विविध ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, विविध गावातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai