Breaking News
विस्तारित जेट्टींसह मिळणार मुलभूत सुविधा ; 87.84 कोटींच्या कामाला मंजुरी
उरण ः जगप्रसिद्ध असणाऱ्या घारापुरी अर्थात एलिफंटा बेटावर दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात. मात्र येथे पर्यटकांसाठी आवश्यक मुलभूत सुविधांची कमतरता आहे. त्यासाठी येथील अस्तित्वातील जेट्टीची लांबी व रुंदी वाढविणे तसेच इतर मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सागरमाला अंतर्गत 87.84 कोटींच्या खर्चाला गृह विभागाकडून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे घारापुरी बेटाचा विकास होण्यास मदत होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील उरण येथे असलेले घारापुरी बेटावरील ऐतिहासीक लेणी पाहण्यासाठी दरवर्षी 8 ते 10 लाख देशी व विदेशी पर्यटक जलमार्गाने प्रवास करुन बेटावर येतात. शेतबंदर जेट्टीला प्रवासी चढ उतार करण्यासाठी सहा ठिकाणी बोटी लावता येतात. गर्दीच्या वेळेस या जेट्टीस प्रवासी बोटी लागण्याकरीता जागा कमी पडत असल्याने त्यांना जेट्टीटची जागा रिकामी होण्याची वाट पाहावी लागते. तसेच जेट्टीला असणाऱ्या पायऱ्या मोडकळीस आलेल्या असून जेट्टीची नादुरुस्त अवस्थेत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच बेटावर येणाऱ्या पर्यटकांसाठीही आवश्यक मुलभूत सुविधांची कमतरता आहे. जेट्टीस असणारा पोचरस्ता हा अरुंद आहे. तसोच पोचरस्त्यावर मिनी ट्रेन धावत असल्याने व रस्त्याच्या कडेला दुकानेही असल्याने पर्यटकांना येथून चालण्यास अडचण निर्माण होते. यासाठी शेतबंदर येथील जेट्टीचा विकास करणे, प्रवाशांकरीता मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच पोचरस्ताचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. सदर कामाचा प्रस्ताव महाराष्ट्र सागरी मंडळाने शासनाकडे पाठवला होता. त्याला शासनाच्या गृह विभागाने मंजुरी दिली आहे. या कामासाठी सागमाला कार्यक्रमाअंतर्गत 87.84 कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
सदर कामामध्ये जेट्टीची लांबी व रुंदी वाढवणे (ॲप्रोच जेट्टी 235.00 मी लांब) प्री कास्ट काँक्रीट ब्लॉक च्या सहाय्याने जेट्टीचे बांधकाम करण्यासाठी 34 कोटी 77 लाख 15 हजार 225 रु, बर्थिंग जेट्टी (85.00लांबी) साठी 29 कोटी 83 लाख 60 हजार 421 रु. आणि गाळ काढणे कामासाठी 1 कोटी 55 लाख 80 हजार 950 रु. रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अशा एकूण 66 कोटी 16 लाख 56 हजार 596 रुपये खर्चाच्या कामासह उर्वरित रॉयटी व इतर शुल्कासह एकूण 86.84 लाखांच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यातील 50 टक्के निधी केंद्र शासनाकडून प्राप्त झाल्यावर राज्य शासनाकडून निधी वितरीत केला जाणार ओह. या कामामुळे घारापुरी बेटावर मुलभूत सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे घारापुरीचा विकास होणार असून पर्यटनालाही चालना मिळेल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस