Breaking News
उरण ः आगरी, कोळी आणि कराडी या जातीमध्ये लग्न विधीत हळद आणि देवादिकांच्या विधी करताना जे गाणे असते त्याला धवला व ते गाणाऱ्या महिलांना धवलारीण म्हणतात. त्या वृद्ध स्त्रियांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
विमला तलाव मधुबन कट्ट्यावर ज्येष्ठ नागरिक आणि रसिकांना कविसंमेलन आणि विविध उपक्रमातून आनंद देण्यासाठी कोमसाप अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे आणि मधुबन कट्टा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, उरण कोमसाप, रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत असतात. यावेळी 27 बालकवींना कविसंमेलनातून रसिकांपुढे आणले. तसेच तालुक्यातील करंजा येथील अनुबाई पांडुरंग ठाकूर, केळवणे येथील चंद्राबाई गणपत पटील आणि कुंडेगावच्या कुसुम काशिनाथ पाटील या तीन वृध्द धवलारीणींना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या शुभ हस्ते मधुबन कट्ट्यावर ज्येष्ठ कवी संजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लेखिका शर्मिला गावंड, संपदा पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी धवलारीणींनी धवला गाऊन श्रोत्यांना आगळा वेगळा आनंद दिला. बालकवी अनुज शिवकर याने शिव गौरव गीत गाऊन रसिक प्रेषकांना प्रसन्न केले. अनामिका राम या बालकवयित्रीने आणि अन्य बालकवींनी आपल्या स्वरचित कवितेने सर्वांना भारावून टाकले. “उपक्रमांची वारी “ च्या गुणी शिक्षिका असलेल्या लेखिकेला आणि मेहनती शिक्षिका शर्मिला गावंड यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच दोहे लिहिणाऱ्या न.ग.पाटील यांना रायगडभूषण प्रा एल बी पाटील यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना जोशी यांनी केले तर म.का.म्हात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai