Breaking News
उरण ः करोडो रुपये खर्च करुन करंजा रेवस पुलाचे काम हाती घेतले आहे. मात्र या प्रकल्पामुळे बाधित होणारे शेतकरी, मच्छीमार आदींना मिळणारा मोबदला, भू संपादन, नुकसान भरपाई, रोजगार, या सर्वांमध्ये दिरंगाई होत आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ करंजा व कोंढरी गावचे प्रकल्पग्रस्त, शेतकरी, ग्रामस्थ हे 15 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड समोर बेमुदत उपोषण करणार आहेत.
समुद्र किनारी असलेल्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीत करंजा गावातून सुरु असलेल्या करंजा रेवस पुलाच्या निर्माण कार्याला ऑक्टोबर 2024 रोजी सुरवात झाली. सदर पुलाचे काम अफकॉन कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे. हे काम शासनाच्या एम.एस.आर.डी.सी च्या माध्यमातून टेंडर प्रक्रिया पूर्ण करून सुरु करण्यात आले आहे. सदर काम सुरु करण्यापुव एम एस आर डी सी मार्फत या मार्गात बाधित होणाऱ्या जमीन मालकांना, मच्छिमारांना किंवा प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. अफकॉन कंपनीच्या अथवा एमएसआरडीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांची परवानगी न घेता ड्रीलिंग, पायलिंग, जमीन सर्वेक्षण, जमीन मोजणीचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सदर काम सुरु आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये व प्रकल्पग्रस्तांमध्ये एमएसआरडीसी आणि अफकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यां विरोधात प्रचंड संताप, रोष निर्माण झाला आहे. शासकीय अधिकारी वर्गांकडून दडपशाही आणि हुकूमशाही पद्धतीचा वापर करून अफकॉन कंपनी कडुन शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची भीती दाखविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्त वर्गात संतापाची लाट पसरली आहे. संबंधित कंपनी प्रशासनकडून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी हे उरण मधील शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांना फसविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सदर ग्रामस्थ, शेतकरी, प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर करंजा व कोंढरी गावातील ग्रामस्थ, शेतकरी, प्रकल्पग्रस्तांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी म्हणजेच रायगड जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात 17 मे 2025 रोजी चाणजे ग्रामपंचायत कार्यालयात महत्वाची बैठक संपन्न झाली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai