पाणी चोरी रोखा, वीज पुरवठा सुरळीत करा
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 17, 2026
- 18
वनमंत्री गणेश नाईक यांचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश
नवी मुंबई ः नवी मुंबई शहरातील विजेचा लपंडाव आणि पाणी समस्येवर उपाय योजना करण्यासाठी वनमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना नवी मुंबईतील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देतानाच पालिका अधिकाऱ्यांना पाणी चोरांचा शोध घेण्याचे आदेश दिले.
बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शहरातील वीजपुरवठ्याचा आढावा घेतला. यावेळी गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून वाढलेल्या तक्रारींची कारणे आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती देण्यात आली. उपस्थित लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागातील वीज समस्या पोट तिडकेने मांडल्या. महावितरण कडे विजेची साधनसामग्री, दुरुस्तीसाठी केबल उपलब्ध नसतात, अशा तक्रारी केल्या. महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांनी बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील सुमारे 80 टक्के वीज वितरण जाळे भूमिगत स्वरूपाचे आहे. भूमिगत केबलमध्ये दोष निर्माण झाल्यानंतर त्याचे अचूक ठिकाण शोधणे, उत्खनन करणे आणि दुरुस्ती करणे ही वेळखाऊ प्रक्रिया असते. अनेकदा केबलमधील जॉइंटमध्ये गळती किंवा तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने पुरवठा विस्कळीत होतो. दोषग्रस्त ठिकाण शोधून दुरुस्ती करण्यासाठी साधारण दोन ते तीन तासांचा कालावधी लागत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले.
उच्च दाबाच्या वाहिन्या आणि प्रमुख फीडरमध्ये कोणतीही मोठी अडचण नसली तरी कमी दाबाच्या (एलटी) केबल नेटवर्कमध्ये वाढत्या भारामुळे बिघाड वाढले आहेत. उष्णता आणि आर्द्रतेमुळे वातानुकूलित यंत्रणा, पाण्याचे पंप, रेफ्रिजरेटर आणि अन्य विद्युत उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत विजेचा भार सुमारे 30 टक्क्यांनी वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तक्रारींवर जलद प्रतिसाद देण्यासाठी काही भागांमध्ये स्वतंत्र संपर्क क्रमांक आणि तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात येत आहेत. अतिरिक्त मनुष्यबळ, कंत्राटी पथके आणि यंत्रसामग्री तैनात करून दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू असल्याचा दावा महावितरणने केला आहे. यावर आवश्यक मनुष्यबळ आणि विजेची साधनसामुग्री उपलब्ध करून सुरळीत वीज पुरवठा करण्याची सूचना मंत्री नाईक यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली. गुंडगिरी करून विजेच्या केबल घेऊन जाणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलिसात तक्रार करण्याची सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली. आवश्यकता भासल्यास महावितरण साठी सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.
- पाणी चोरांचा शोध घ्या
शहरातील पाणी समस्येवर महापालिका अधिकाऱ्यांना सूचना देताना मोरबे धरणाच्या जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी वाढल्याचे वनमंत्री नाईक म्हणाले. स्काडा प्रणालीतून पाणी चोरांचा शोध घेऊन पाणी चोरी थांबवण्याचे निर्देश त्यांनी दिले. बारवी धरणातून नवी मुंबईला देय असलेला 25 एमएलडी पाण्याचा साठा अद्याप मिळालेला नाही. तो लवकरात लवकर मिळवण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याचे निर्देश देखील वनमंत्री नाईक यांनी बैठकीत दिले. - स्वतंत्र अतिक्रमण विरोधी पोलीस पथक
महापालिका अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये शहरातील उड्डाणपुलाखालील भिकारी आणि उपद्रवी व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. नवी मुंबईतील 50 टक्के फेरीवाले हे बाहेरचे असून सर्वेक्षण करून या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर अतिक्रमण विरोधी कारवायांसाठी महापालिके करता लवकरच स्वतंत्र पोलीस पथक उपलब्ध होणार असल्याचे देखील वनमंत्री नाईक म्हणाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai