आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक, नवी मुंबईतील संभाव्य विकास कामे आणि राज्यातील बदललेले राजकिय समिकरणे याबाबत माजी आमदार संदीप नाईक यांनी साधलेला दिलखुलास संवाद...
प्रश्न 1 - बदलत्या सरकारच्या धोरणानुसार प्रभाग रचना बदलत आहे त्याविषयी आपली भुमिका काय ? उत्तर - नवी मुंबई महापालिकेत आतापर्यंत एकप्रभाग रचनेनुसारच निवडणुका झाल्या आहेत. नगरसेवक हा पालिकेत लोकांचे प्रतिनिधित्व करणारा घटक असून तो प्रभागाशी समरस झालेेला असतो. पालिकेत यापुर्वी अनेक निवडणुका झाल्या पण सदोष प्रभागरचना कधी झाली नाही. यावेळी झालेली प्रभागरचना विशिष्ट पक्षाला फायदा करुन देण्यासाठी करण्यात आली होती. आम्ही कोणत्याही प्रभागरचनेनुसार निवडणुक लढवण्याची तयारी ठेवली आहे. परंतु संभाव्य प्रभाग रचनेमुळे नागरिकांची गैरसोय होणार होती. त्यामुळे आम्ही त्यास उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. परंतु बदललेल्या सरकारने 2017 च्या निकषांनुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने हा विषय आता संपला आहे.
प्रश्न 2 - अडीचवर्ष पालिका निवडणुक लांबली आहे त्याबद्दल काय सांगाल? उत्तर - नगरसेवक हा नागरिकांचा हक्काचा घटक आहे. त्याचबरोबर तो नागरिकांच्या समस्या आणि प्रशासन मधील दुवा आहे. अनेक अडचणींच्या वेळी नागरिक आपल्या नगरसेवकाला हक्काने काम सांगतात. याचा अनुभव कोरोना काळात लोकांना आला आहे. प्रशासनापेक्षा नगरसेवक नागरिकांच्या मदतीला धावला होता. लोकांना बेड उपलब्ध करुन दे, औषधे मिळवून देण्यापासून अॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन देण्यापर्यतची कामे त्याने केली आहेत. त्यामुळे मागील अडीच वर्षात नगरसेवक नसल्याने नागरिकांची मोठी कुंचबना झाली आहे. त्यामुळे लवकरच निवडणुका होऊन नागरिकांना त्यांचा लोकप्रतिनिधी निवडण्याचा हक्क मिळाला पाहिजे.
प्रश्न 3 - निवडणुकीसाठी कोणते मुद्दे जनतेपुढे मांडणार? उत्तर - नवीमुंबई शहर हे इतरांच्या तुलनेत उजवे आहे. पुरेसे पाणी, कचर्याची योग्य विल्हेवाट, आरोग्य, शिक्षण या सेवा इतरंाच्या तुलनेत चांगल्या आहेत. कोरोना काळात ज्या त्रुटी प्रकर्षाने जाणवल्या त्या दूर करुन अजून दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न भविष्यात आम्ही करणार आहोत. त्यासाठी नागरिकांकडून सूचना घेऊन त्यात आमुलाग्र बदल करु. नागरिकांचा विकास हाच उद्देश केंद्रस्थानी ठेवून आतापर्यंत वाटचाल केल्याने नवी मुंबईकरांनी 30 वर्ष आम्हाला प्रेम दिले आहे. हेच प्रेम ते कायम ठेवतील हा विश्वास आहे.
प्रश्न 4 - पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला मात्र वाढणार्या वाहतुकीचे नियोजन कसे कराल? उत्तर -पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला असला तरी त्याचा ताण पायाभुत सोयीसुविधांवर पडणार आहे. टाटा पावरच्या प्रकल्पातून सोडण्यात येणारे पाताळगंगेचे पाणी मोरबे धरणात आणण्याचे नियोजन करण्याचा मानस आहे. सीटी मोबॅलिटीच्या माध्यमातून या अधिवेशनात नाईक साहेबांनी खारघर-बेलापुर बोगद्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्याचबरोबर वाशी टोलनाक्यापासून कोस्टल रोड प्रस्तावित करुन थेट तो ठाण्याला जोडल्यास शहरात येणार्या लोकांना बाहेरुन कोपरखैरणे, घणसोली, दिघा व ऐरोली येथे येण्याचा पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. घणसोली-ऐरोली येथे उड्डाणपुल तसेच कोपरखैरणे ते विक्रोळी उड्डाणपुल मार्गी लागल्यास नागरिकांची कनेक्टीव्हीटी वाढेल. नाईक साहेबांनी नवी मुंबईत महापे येथे डाटा सेंटर यावे म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी ही कनेक्टीव्हीटी गरजेची असून नवी मुंबईकरांच्या सहाय्याने ती आम्ही पुर्ण करु हा विश्वास देतो.
प्रश्न 5 - राज्यातील सत्ताबदलाकडे आपण कसे पाहता? उत्तर - महाविकास आघाडीचे स्थापन झालेले सरकार हे अनैसर्गिक होते. आता एकाच विचारांचे सरकार अस्तित्वात आले आहे. त्यामुळे आमच्यापुढील आव्हान कमी झाले असून नवी मुंबईकरांच्या हिताचे अनेक प्रश्न या सरकारच्या माध्यमातून मार्गी लावता येतील अशी आशा आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. आताचे झालेले राज्यातील परिवर्तन हे नवी मुंबईकरांच्या हिताचे आहे असे मी समजतो.
प्रश्न 6 - आपणांस सोडून गेलेले पुन्हा परतू लागले आहेत त्याबाबत आपली भुमीका काय? उत्तर - जे इतर पक्षात गेले त्यांच्या पक्षांतराची कारणे वेगवेगळी आहेत. कुणाला पक्षांतर करायला भाग पाडले गेले तर काहींनी स्वार्थासाठी पक्षांतर केले. आता बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे व भाजप युतीचे सरकार राज्यात आले आहे. युतीचे धोरण आणि पक्ष सोडून गेल्यावर ना उमेद न होता काम करणार्या सर्व कार्यकर्त्यांचे मत विचारात घेऊन नवी मुंबईच्या विकासासाठी योग्य वेळी योग्य ती भुमिका ठरवून निर्णय घेतले जातील.
प्रश्न 7 - कोणत्या सेनेसोबत युती कराल? उत्तर - आता भारतीय जनता पार्टी ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बांधिलकी ठेवणार्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सत्तेत आहे. पक्षाच्या ध्येयधोरणाबरोबर नवी मुंबई भाजपला राजकीय प्रवास करावा लागणार आहे. पक्ष जे धोरण आखून देईल त्यानुसार नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महापालिकेची निवडणुक लढवली जाईल.
प्रश्न 8 - पालिकेतील प्रशासकाच्या कारभारावर आपण समाधानी आहात का? उत्तर - पालिकेत गेल्या अडीच वर्षात झालेली कामे अतिशिय क्लेषदायी होती. लोकप्रतिनिधी असल्यावर प्रत्येक कामाची चर्चा ही सर्वसाधारण सभेत तसेच स्थायी समितीत होत असते. सर्व कामांवर जागरुक नागरिक, पत्रकार यांची नजर असते. त्यामुळे ही कामे पारदर्शकपणे होत असतात. परंतु, प्रशासकांच्या काळात या प्रकारच्या पारदर्शकतेचा अनुभव नागरिकांना आलेला नाही. अनावश्यक कामे काढली गेल्याची चर्चा पालिकेत आहे. चुकीचे निर्णय घेतल्याने त्याचा दिर्घकालीन परिणाम होणार आहे. अनियंत्रित प्रशासनामुळे शहराचे पर्यायाने नागरिकांचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे.
प्रश्न 9 - कुठल्याही कारभारावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, याबद्दल काय सांगाल? उत्तर -नवी मुंबई शहराला एक राजकीय, समाजिक जडणघडण आहे. लोकप्रतिनिधी, पत्रकार, पालिका अधिकारी हे शहराच्या विकासाकरीता एकत्र काम करत आहेत. एखादा प्रकल्प अनावश्यक वाटल्यास त्यात योग्य तो बदल करण्याची भुमिका नाईक साहेबांनी वेळोवेळी घेतली आहे. त्याचबरोबर एखादा प्रकल्प शहराच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असेल तर सर्वच राजकीय पक्षांनी सहकार्यही केले आहे. त्यासाठी मोरबे धरणाचे उदाहरण देता येईल. नाईक साहेबांनी वेळोवेळी दाखवलेली लवचीकता त्यास जरी कारणीभुत असली तरी पालिकेतील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना मी त्याचे श्रेय देतो. त्यामुळे हे या सर्वांचे एकत्रित यश आहे.
प्रश्न 10 -सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय वादळाविषयी काय सांगाल? उत्तर -राज्यात सध्या राजकीय गोंधळाची अभुतपुर्व स्थिती आहे. मला वाटते महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी अनिर्णायक परिस्थिती उद्धभवली आहे. एक तरुण राजकर्ता तसेच विद्यार्थी म्हणून मी त्याकडे पाहत आहे. भविष्यात राजकारणाच येऊ ईच्छिणार्या प्रत्येकाला या परिस्थितीतून शिकण्यासारखे बरेच काही आहे. यातून राज्याच्या हिताचे चांगलेच घडेल अशी मला आशा आहे.
प्रश्न 11 - राजकारणातील सहभागाविषयी तरुणांना काय मार्गदर्शन कराल
उत्तर -प्रत्येक वेळी एक पिढी जावून नवी पिढी येत असते. या बदलाकडे मी सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत आहे. मागील अनुभवी पिढी ही येणार्या पिढीला खूप मोठा अनुभव देऊन जात असते. त्यात मी स्वतःला भाग्यवान समजतो. खूप उंचीच्या लोकंाचे काम मला पाहायला मिळाले व त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव मिळाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेबांचे सर्वच क्षेत्रातील अद्यावत ज्ञान व कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याचा स्वभाव तसेच तरुण देवेंेद्र फडणवीस यांचे आधुनिक नेतृत्व अनुभवायला मिळाले. त्यामुळे प्रत्येक नेत्याकडून आपल्याला काहींना काही शिकायला मिळते. अनुभवाची शिदोरी नवीन माणसाकडे नसते पण त्याची उर्जा ही शहराच्या, राज्याच्या जडणघडणीकरीता अत्यंत महत्वाची आहे. याचा समलोत साधत तरुणांनी मेहनत करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. पद कोणते भेटते वा कोणता सन्मान मिळतो याकडे पाहण्यापेक्षा मिळेल त्या संधीचे सोन केले पाहिजे.
''अनुभवाची शिदोरी आणि नव उर्जा याचा समतोल साधत तरूणांनी मिळेल त्या संधीचे सोने करावे."
रिपोर्टर
मोना माळी-सणस
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस