Breaking News
पंजाबवर चाळीस वर्ष सत्ता गाजवणार्या पक्षांचा ओला-सुका पालापाचोळा अरविंद केजरीवाल यांच्या झाडूने असा काही साफ केला आहे की निदान पुढील पाच वर्षे तरी त्यांना कोणतेही काम पंजाबच्या जनतेने ठेवलेले नाही. संपूर्ण पंजाबमध्ये ‘आप’ ने आपला झाडू फिरवत दोन तृतीयांश बहुमत संपादित केले आहे. निवडणुकीपूर्वीच अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केल्याप्रमाणे भगवान मान यांना मुख्यमंत्रीपद दिले आहे. पंजाब मधील जनतेने भूतो न भविष्यती बहुमत ‘आप’च्या झोळीत टाकले आहे ते पाहिले की मुखातून ‘मान’ गये ‘आप’को हेच उद्गार बाहेर पडतात. पंजाबमध्ये दिल्ली सारखेच जरी प्रचंड बहुमत अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ पक्षाला मिळाले असले तरी त्यामुळे ‘आप’ची जबाबदारी तेवढीच वाढली आहे. दिल्ली मॉडेलवर पंजाबमध्ये सत्तेवर आलेला ‘आप’ जर पंजाबमध्ये अपयशी ठरला तर मात्र आपच्या वाढीला निश्चितच घर-घर लागेल. याचे भान अरविंद केजरीवाल यांना असेल आणि त्यादृष्टीने ते प्रयत्न करतील अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.
पंजाबमधील आपच्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाला देशात पर्याय म्हणून ‘आप’चा उदय होत असल्याची चर्चा लगेच समाज माध्यमांवर सुरू झाली. गेली चाळीस वर्ष प्रयत्न करूनही संपूर्ण देशात भारतीय जनता पक्ष अजूनही देशात स्थिरस्थावर झालेला नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीवरून हे स्पष्ट होते. अजूनपर्यंत भाजपचा शिरकावही कर्नाटक वगळता दक्षिण भारतात झालेला नाही. अजूनही तेथे प्रादेशिक पक्षांचा बोलबाला आहे. त्यामुळे एक राज्य जिंकले म्हणून आप भाजपाला पर्याय ठरेल असे म्हणणे आणि त्यादृष्टीने प्रसार माध्यमांनी कल्लोळ करणे चुकीचे आहे. भाजपला पर्याय देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक मजबूतीने उभे राहणे गरजेचे आहे. सध्यातरी ती जागा काँग्रेस पक्षाने व्यापली असली तरी प्रत्येक निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष देशातील आपले स्थान गमवत आहे. पहिल्यांदा आप ला काँग्रेस पक्षाची जागा व्यापावी लागेल त्यासाठी अनेक राज्यात सत्ता किंवा विरोधी पक्षात तरी स्थान मिळवावे लागेल. संपूर्ण देशभर कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे कार्य म्हणावे तितके सोपे आणि आणि तितकेच जटील आहे.
पुढील 20 वर्ष देशात निर्विवाद सत्ता भोगण्यासाठी अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय पक्षाला संपवण्याची गरज चाणाक्ष मोदींनी ओळखून सुरुवातीपासूनच काँग्रेस पक्षाला कमजोर करण्याचा प्रयत्न केला. देशातील जनतेसमोर काँग्रेस पक्षाची प्रतिमा भ्रष्टपक्ष अशी करून नंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रतिमा पप्पू म्हणून प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले. राहुल गांधींनीही राजकीय अपरिपक्वतेमुळे अनेकवेळा त्यात भरच टाकली आणि आपल्यावरील लोकांचा विश्वास कमजोर केला. काँग्रेस पक्षासोबत असणार्या अनेक मित्र पक्षांनी एकतर काँग्रेसला कमजोर केले किंवा भाजपात विलीन होऊन स्वतःचे अस्तित्व संपवले. आत्ता काँग्रेस पक्षातील जी-23 या गटानेही डोके वर काढून अडचणीच्या वेळी पक्षाला अधिक कमजोर केले. या पार्श्वभूमीवर विरोधक आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेने विखुरले असल्याने काँग्रेसला सोबत घेऊन ते कधीही मोदींना देऊ शकत नाहीत. त्यामुळे संपूर्ण देशात जर यापुढे भाजपसमोर कोणाला आव्हान उभे करायचे असेल तर किमान पुढील पंधरा वर्ष तरी सातत्याने काम करावे लागेल जी कुवत सध्या आप कडेच असल्याने आपचे भविष्य उज्ज्वल आहे.
मोदींनी भाजपची प्रतिमा भ्रष्टाचार विरोधी आणि विकासाचा ध्यास धरललेला पक्ष म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीयांच्या मनात निर्माण केली आहे. याउलट विरोधकांची प्रतिमा भ्रष्टाचारी आणि घराणेशाहीचे पुरस्कर्ते अशी आहे. या प्रतिमेला जर कोणी तडा देऊ शकत असेल तर आजच्या घडीला अरविंद केजरीवाल शिवाय कोणताही पर्याय विरोधकांकडे नाही. दिल्लीतील सत्ता मिळवल्यानंतर केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने राजकारणाचा आणि समाजकारणाचा कायापालट केला त्यामुळे भारतीयांच्या मनात आम आदमी पक्षाबद्दल कुतूहल आहे. आपने अनेक राज्यात प्रवेश केला असून हळूहळू ते आपले हात-पाय पसरत आहेत. सध्यातरी आप पक्ष हा एक खांबी तंबू असल्याचे जाणवत आहे. केजरीवाल सोबत त्या पक्षाचा विस्तार करणारं एकही व्यक्तिमत्व दिसत नाही, हे कटू सत्य आहे. देशात जर पर्याय उपलब्ध करायचा असेल तर केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन त्याची जबाबदारी मनीष सिसोदिया यांच्या खांद्यावर टाकून आता इतर राज्यात स्वतः फिरले पाहिजे. देशातील हुशार, प्रामाणिक आणि प्रज्ञावान कार्यकर्त्यांची फळी उभारली पाहिजे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून आंदोलने कशी करावीत आणि सामाजिक प्रश्न कसे उचलून धरावेत याचे ज्ञान दिल्यास हा पक्ष आपली वेगळी प्रतिमा निर्माण करेल. त्याचबरोबर कार्यकर्त्यांचे चरितार्थ कसे चालेल याचेही नियोजन करावे लागेल.
आज पंजाब मध्ये सत्ता मिळाली आहे. पंजाब हे देशातील सीमेवरील संवेदनक्षम राज्य आहे. दिल्लीची सत्ता आणि पंजाब यात खूपच अंतर आहे. दोघांचे प्रश्न वेगळे आहेत. दिल्ली हि विस्तारित महापालिका म्हटल्यास वावगे ठरू नये या उलट पंजाबमध्ये कृषी, उद्योग आणि गृह विभाग हाताळावे लागणार असून पहिल्यांदाच ‘आप’ला त्याची धोरणे आखावी लागणार आहेत. अनेक सुविधा मोफत देण्याचे आश्वासन नागरिकांना देऊन पंजाबची सत्ता मिळवली आहे. यामधील किती आश्वासने पूर्ण केली जातात यावरच केजरीवाल यांची विश्वासहार्यता आणि पुढील राजकीय कारकिर्दीचे भविष्य ठरणार आहे. पंजाबच्या सीमा केंद्राच्या अखत्यारीत असून त्यामुळे ते अमली पदार्थांच्या व्यापाराला कसा आळा घालतात हेही पाहणे औचित्याचे ठरणार आहे. केजरीवाल यांनी मुख्यमंत्री केलेले मान यांचे व्यक्तिमत्व भगवान भरोसे असून ते कधी कसे वागतील याचा नेम यांनाच नाही. त्यामुळे खरी कसोटी आम आदमी पक्षाची नसून केजरीवाल यांची आहे. गेल्या पाच वर्षात विरोधक म्हणून काम करून काँग्रेस आणि भाजपचा पालापाचोळा करून कचराकुंडिची जागा दाखवणार्या केजरीवाल यांना तर म्हणावेच लागेल ‘मान गये आपको’....
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai