Breaking News
सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टांच आणली आहे. ईडी एव्हढ्यावरच थांबली नसून त्यांचे बंधू प्रवीण राऊत यांना पीएमसी बँक घोटाळा आणि पत्रावाला चाळ पुर्नविकास प्रकरणी अटक करुन त्यांच्या संपत्तीवरही टांच आणली आहे. कालपर्यंत आपल्या लेखणीने आणि राजकीय दिव्यदृष्टीने इतरांचे भवितव्य सांगणार्यांना स्वतःचे भवितव्य दिसू नये याचे आश्चर्य वाटते. जेव्हापासून ईडीच्या कारवाईचे शुक्लकाष्ट राऊतांच्या मागे लागले तेव्हापासून त्यांचा तोल गेला असून अतिशय गलिच्छ शब्दात ते दररोज ‘संजय उवाच’ पत्रकारांना कथन करत आहेत. त्यांच्या या वागण्यावरुन ‘तो हा नव्हेच म्हणण्याची वेळ’ भविष्यात महाविकास आघाडीवर नक्कीच येईल हे सांगण्यास कोणत्याही संजयची गरज नाही. महाराष्ट्र झुकणार नाही-मोडणार नाही असे ते सध्या बडबडत असून महाराष्ट्र म्हणजे काही संजय राऊत नव्हे याचे भान त्यांनी ठेवायला हवे. त्यांच्यावरील कारवाई हि कदाचित त्यांनी केलेल्या नियमबाह्य आर्थिक उलाढालींमुळे होत असेल, त्याला त्यांनी धीरोदात्तपणे सामोरे गेले पाहिजे. तसे न करता दररोज महाभारतातील संजय प्रमाणे प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त होणे हे त्यांनाच तापदायक ठरू शकते. राजकारणात अति बोलणे हे नेहमीच संकटाला आमंत्रण देते तसेच काहीसे सध्या राऊतांचे झाले आहे.
संजय राऊतांची ओळख महाराष्ट्राला प्रामुख्याने झाली ती सामनाचे संपादक झाल्यापासूनच. बाळासाहेब व शिवसैनिकांच्या कवचकुंडलांच्या छायेत त्यांच्या लेखणीला धार चढली आणि त्यांनी यशाचा एक-एक टप्पा पार केला. उद्धव ठाकरेंशी सलगी करत त्यांनी राज्यसभा पदरी पाडली. त्यांच्याकडे लेखणीच्या तलवारबाजी शिवाय कोणतेही संघटन आणि राजकीय कौशल्य नाही पण ठाकरे आडनावाच्या आड शिवसेनेत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. संघटनेतील नेमणुकांत त्यांचा हस्तक्षेप वाढला आणि मग राऊतांचीही चौथाई सुरु झाली. राजकारणातून झटपट आर्थिक उन्नती साधता येते हे लक्षात आल्यावर त्यांच्या भावानेही मग मुलुंड परिसरात आपले बस्तान बसवले. भूखंड विक्रीतील मध्यस्ती, भूखंड विकासापासून ते रेडीमिक्स काँक्रीट पुरवण्याचे उद्योग प्रवीण पणे राऊत कुटुंबांनी केले. व्यवसाय करणे हा गुन्हा नाही पण तो करत असताना कायद्याच्या सर्व कक्षा सांभाळून करणे हे त्यांच्या हिताचे होते. पण आपले कोण काय वाकडे करणार या धुंदीत राहिल्याने व्यवसायातील छोटिशी चूक किती महागात पडू शकते हे आता त्यांच्या ध्यानी आले असेल.
महाविकास आघाडी सरकार स्थापण्यात राऊतांची भूमिका मोठी होती. आपण शिवसेनेचे प्रवक्ते (संजय) आहोत कोणी योद्धा नाही हे विसरून दररोज पत्रकार परिषद घेऊन मोदीं -शहांपासून सर्वाना लक्ष्य केले. सेनेचा बालेकिल्ला एकहाती लढवला. पण राजकारणात सारीपाट मांडत असताना आपल्या भोवती भक्कम तटबंदी न उभारता फक्त इतरांवरच तोफ डागत राहिल्याने आज विरोधकांच्या मार्यापुढे त्यांची होती तेव्हढी तटबंधी ढासळली. मोडणार-वाकणार नाही अशा वल्गना करणार्या राऊतांच्या ढासळणार्या तटबंदीला सावरण्यासाठी दस्तुरखुद्द पवारांना दिल्लीत पायउतार व्हावे लागले. त्यांनी मोदींची भेट घेऊन राऊतांसाठी मनधरणी केल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात भाजपच्या सत्तेच्या स्वप्नांना सुरुंग लावला त्यामुळे अशी कारवाई भविष्यात होणारच याचे भान राऊतांना असणे गरजेचे होते. केंद्र सरकारला होणारा विरोध आणि विरोध करणार्या विरोधकांना कशाप्रकारे संपविले जातंय हे आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय. शुद्ध सुडाचं राजकारण केलं जात आहे. त्यामुळे राऊतांनी अधिक प्रगल्भतेने हा लढा लढणे अपेक्षित होते.
बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हि अतिशय वेगळी आहे. बाळासाहेबांनी जीवाला जीव देणारे सैनिक तयार केले. 20% राजकारण आणि 80% समाजकारण या धर्तीवर सेनेच्या विचारांची बांधिलकी जपणारे शिवसैनिक होते. त्यामुळे सर्वच समाजाला ते आपलेसे वाटायचे. सेनेकडे वाकड्या नजरेने बघण्याची ताकद कोणत्याच पक्षात नव्हती. परंतु याउलट उद्धवसेना हि 80% राजकारण व 20% समाजकारण तत्वावर असल्याने शिवसैनिकांतील कट्टरता आता लोप पावली आहे. सेनेत सगळीकडे अर्थकारणाला महत्व आल्याने जनमानसातील शिवसेनेची प्रतिमा ढासळली आहे. गेल्या अडीच वर्षात शिवसेनेने एकही मोठे आंदोलन जनतेच्या मुद्द्यांवर केले नाही. बंद, आंदोलन, बेधडक कारवाई हि शिवसेनेची खरी ओळख पण हाच आत्मा आज शिवसेना गमावून बसली आहे. त्यामुळेच केंद्र सरकार राऊतांवर कारवाई करू शकली. 15 दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंचे मेहुणे पाटणकर यांची संपत्ती सुद्धा जप्त झाली. शिवसैनिकांच्या अभेद्य कवचकुंडलांमुळे बाळासाहेबांच्या काळात अशी कारवाई करताना समोरच्याला शंभरदा विचार करावा लागे पण आज उद्धवसेनेने आपल्या कर्माने कवचकुंडलांना अव्हेरल्याने सोमय्या, भातलकर आणि शेलार शिरजोर झाले आहेत.
भाजपच्या विरोधात बोलणार्यांची तोंडे साम-दाम-दंड-भेद वापरून बंद केली जात आहेत. अनिल देशमुखांच्याविरोधात ईडी, सीबीआय, व इन्कम टॅक्सने 100 धाडी टाकल्या. ते दोषी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे पण ज्याने आरोप केला त्या परमबीर सिंगाने प्रतिज्ञापत्रात सांगितले की, मी केलेल्या आरोपांबाबत कोणताही पुरावा उपलब्ध नाही तरी देशमुख तुरुंगातच. विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी सोमय्याने नागरिकांकडून पैसे जमवले हा आरोप कालच झाला. मग हे पैसे गेले कुठे?याची कोण चौकशी करणार? विरोधकांवर कारवाई होते तेव्हा ते घोटाळेबाज ठरतात परंतु जेव्हा भाजपवर कारवाई होते तेव्हा ती सुडाने होते असा कल्लोळ भाजप करतो. प्रकरण कोणतेही असो दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. पण भाजप सत्तेवर आल्यावर मात्र कोणतीही कारवाई का होत नाही हे कोडे सर्वानाच आहे. आता मुंबई महापालिकेच्या निवडणूक तोंडावर आहेत, त्यामुळे भविष्यात अशा कारवाईची अनेक प्रकरणे महाराष्ट्रात पाहायला मिळतील. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधक या कारवाईला कसे सामोरे जातात यावरच त्यांचे अस्तित्व टिकणार आहे. राऊत, सरनाईक यांनी धीरोदात्तपणे या कारवाईला सामोरे जावे, वेळ पडली तर तुरुंगवास पत्करावा व बाहेर येऊन पुन्हा बाह्या सरसाव्यात, तरच तुम्ही बाळासाहेबांचे सैनिक शोभाल... नाही तर त्या महाभारत कालीन संजय आणि तुमच्यात फरक तो काय...
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे