Breaking News
गेली अनेक वर्ष सामोपचाराने आणि गुण्यागोविंदाने राहणारा भारतीय आता हिंदू -मुसलमान, हनुमान चालीसा, मंदिर-मस्जिद या अनावश्यक वादात गुंतला आहे. देशात सध्या हिंदू धर्म आणि हिंदुत्व यांचा उन्माद दिवसेंदिवस वाढत आहे. यापूर्वी अशा गोष्टीची म्हणावी तेवढी चिंता वाटत नव्हती कारण विशिष्ट समाजातील लोकच टाळ मृदूंग घेऊन मुसलमान समाजाच्या कल्पोकल्पित अन्यायाच्या कथा भारतीयांवर बिंबवण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु आता समाजातील इतर घटकांचा अशा प्रवृत्तींना मिळणारा वाढता पाठिंबा पाहिला कि जाणवते हा संयोग नसून अतिशय सूत्रबद्धरीतीने देशातील जनतेला अशा वातावरणात धर्मांधतेच्या वातावरणात ढकलले जात आहे. देशात सध्या वाढती बेरोजगारी, महागाई, ढासळलेली आरोग्य व्यवस्थेबरोबरच सर्वसामान्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न आ वासून उभा आहे. परंतु या मुद्द्यावर विरोधक-सत्ताधारी कोणीही बोलत नसून फक्त मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा पठण सारख्या विषयाने सध्या देशाचे आसमंत व्यापून टाकले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्याच्या अट्टाहासापोटी मुंबईत आलेले राणा दाम्पत्य सध्या तुरुंगाची हवा खात आहे. नको त्या गोष्टीचा अतिरेक केल्याने काय घडू शकते याचा अनुभव सध्या राणा कुटुंब घेत असून ज्यांच्यासाठी त्यांनी हे कृत्य केले ते मात्र पत्रकार परिषदा घेऊन त्याचे राजकीय भांडवल करण्यात मग्न आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भोंगा-हनुमान चालीसाच्या नावाने गळा काढणारे त्यांची सुटका व्हावी म्हणून वार्या करत आहेत. ‘शेळी जाते जिवानिशी खाणारा म्हणतो वातड’ या म्हणीचा प्रत्यय याप्रसंगातून राणा दाम्पत्यास निश्चितच आला असेल अशी अशा ठेवायला हरकत नाही. दुसर्यासाठी खड्डा खोदणार्या नवनीतजी स्वतःच त्याच खड्ड्यात पडल्याने ‘राणाजी हमें माफ करना’ एव्हढीच सहानभूती महाराष्ट्र त्यांच्याबद्दल व्यक्त करू शकतो.
महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांच्यामागे इडी-सीबीआयचा ससेमिरा लावल्यानंतरही हे सरकार हालत नाही याची जाणीव झाल्याने आता या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याचे मागील घडामोडीवरून जाणवते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थिर असून पुढील अडीच वर्ष काही हे सरकार पाडता येणार नाही त्यामुळे राज्यात अराजकता निर्माण करून राष्ट्रपती राजवट लावता येते का? याची चाचपणी सध्या भाजपच्या गोटात सुरू आहे. राज्यात दंगा सदृश्य परिस्थिती निर्माण करून अस्थिरता निर्माण करण्यासाठी निरनिराळ्या माध्यमातून हे प्रयत्न होताना दिसत आहेत. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी 3 मे चा अल्टिमेटम महाराष्ट्र सरकारला दिला आहे त्यानंतर जर भोंगे हटवले नाही तर मनसे स्टाइलने ते हटवण्याचा प्रयत्न केला जाईल. खरं तर यामागे मशिदीवरील भोंग्यांशी आणि त्यामुळे होणार्या प्रदूषणाची कोणालाही सोयरसुतक नाही परंतु या मुद्द्यामुळे हिंदू मतांचे ध्रुवीकरण करून मुंबईत शिवसेनेला टक्कर देणारा एक नवीन ‘हिंदू जननायक’ भाजपला जन्मास घालवायचा आहे. येत्या 6-7 महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक असून त्यासाठी एव्हढा खटाटोप भाजपकडून चालला आहे.
गेली तीस वर्षं मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. 40 हजार कोटींचे बजेट असलेली मुंबई महानगरपालिका ही राज्यातील एकमेव महापालिका असून तिचे बजेट केरळ-दिल्ली राज्यांनाही मागे टाकणारे आहे. मुंबई महापालिकेतुन मिळणार्या रसदीवरच शिवसेनेच्या सत्तेचा डोलारा उभा आहे. त्यामुळे शिवसेनेचा महाराष्ट्रात बंदोबस्त करायचा असेल तर सर्वप्रथम मुंबई महानगरपालिकेवरुन शिवसेनेची सत्ता घालवावी लागेल हे गणित बांधून भारतीय जनता पार्टी कामाला लागली आहे. मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या घटली असल्याने इतर राज्यातून आलेल्या लोकांच्या मतावर डोळा ठेवून भाजप हिंदुत्वाचे कार्ड खेळत आहे. मुंबईमध्ये गुजरातनंतर जर कोणत्या राज्यातील समाजाचे प्राबल्य असेल तर ते उत्तर प्रदेश आणि बिहार. या उत्तरेकडील हिंदीभाषिक राज्यात राम-कृष्ण देवतांबरोबर रामभक्त हनुमान याचा जबरदस्त पगडा असल्याने त्यांच्या धार्मिक भावनांना हात घालून मुंबईची सत्ता मिळवण्याचा राजमार्ग भाजपाने चोखाळला आहे. त्यासाठी कधी मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा विषय किंवा हनुमान चालीसा वाचण्याचा विषय निरनिराळ्या माध्यमातून पुढे आणला जात आहे.
राज ठाकरे यांनी भोंग्याची सुपारी कातरल्यानंतर हनुमान चालीसा पठणाची सुपारी घेऊन राणा दांपत्य मुंबईत आले. ज्या नवनीत राणानी संसदेमध्ये जय श्रीराम म्हणण्यास विरोध केला त्यांनी हनुमान चालीसा मुख्यमंत्री यांच्या घरासमोर वाचण्याचे जाहीर करावे यामागे सोचीसमजी रणनीती होती. त्यांच्या या कृतीला विरोध होणार व हनुमान चालीसाला विरोध केला म्हणून शिवसेना हिंदू धर्माच्या विरोधात कशी आहे याबाबत काहूर उठवायचे आणि राणा दांपत्यास चुकून मारहाण झाल्यास राज्यात कायदा सु-व्यवस्था ढासळल्याचे कारण देऊन राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करण्याची शक्यता होती. परंतु राणा दाम्पत्यालाच सरकारने राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकून भाजपच्या स्वप्नाला सुरुंग लावला. आपण जनप्रतिनिधी असून कायदा-सुव्यवस्था, शांतता प्रस्थापित करणे या आपल्या जबाबदारीचा विसर पडल्याने त्यांना तुरुंगात जावे लागले. तुरुंगात जाऊनही या दाम्पत्याने नौटंकी सुरू ठेवली असून कधी अपमानास्पद वागणूक दिली तर कधी जातीची ढाल पुढे करत सरकार व पोलिसांवर कारवाईची मागणी करत सतत केंद्र सरकारकडे पत्रप्रपंच करत आहेत. ज्या राजद्रोहाच्या कलमाचा वापर विरोधकांना नमवण्यासाठी भाजपने केला त्याचे चटके त्यांनाच बसू लागल्यावर मात्र आता नेत्यांची बोबडी वळू लागली आहे. सरकारच्या धोरणांना विरोध करावा, आंदोलन करावे पण सत्तेसाठी धर्माच्या नावाखाली धर्माधर्मात तेढ वाढवून जर राष्ट्राच्या अखंडतेला कोणी नख लावत असेल तर त्यांना राजद्रोहासारख्या कठोर कायद्याची चपराक गरजेची आहे. त्यामुळे नवनीत राणावर झालेली कारवाई समर्थनीय नसली तरी आवश्यक होती. त्यामुळे ‘मुझको राणाजी माफ करना’ एव्हढीच सहानभूती हा महाराष्ट्र आपल्यासाठी व्यक्त करू शकतो.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे