Breaking News
देशात राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल फुंकले गेले आहे. महाराष्ट्रात त्याचे पडसाद मात्र वेगळ्या पद्धतीने उमटत आहेत. यापूर्वी राष्ट्रपती नामनिर्देशीत उमेदवाराच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज श्री संभाजी राजे यांना भाजपने 2016 साली राज्यसभेवर पाठवले. 2016 ते 2022 या कालावधीत ते जरी राष्ट्रपती नामनिर्देशीत उमेदवार असले तरी त्यांची ओळख भाजपचे खासदार म्हणून अधोरेखित झाली. दरम्यानच्या काळात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि एसटी कामगारांचा संप या मुद्द्यांवर त्यांनी इतर पक्षांपेक्षा वेगळी भूमिका घेऊन आपला राजकीय पिंड वेगळा असल्याचे दाखवून दिले. त्यासाठी त्यांनी ‘स्वराज्य’ या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. छत्रपती संभाजी राजे यांची ओळख फक्त शिवरायांचे वंशज एव्हढीच असून त्याच नजरेने महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतो. शिवरायांबद्दल जी भावना प्रत्येक महाराष्ट्रीयांच्या मनात आहे ती भावना त्यांच्या वंशजाबद्दल का नाही ? हा प्रश्न संभाजीराजे आणि उदययनराजे भोसले यांनी स्वतःलाच विचारायला हवा. शिवरायांचे वंशज म्हणून नुसते न मिरवता त्यांचे राजेपण लोकांच्या मनावर कोरण्यासाठी आतापर्यंत काय परिश्रम केले यावरच त्यांचे उद्याचे राजेपण महाराष्ट्रातील पिढीसमोर भविष्यात राहणार आहे. त्यामुळे राज्यसभेच्या उमेदवारीचे दान पदरात पाडण्यासाठी याचक न बनता स्वतःचा पक्ष वाढवून महाराजांना अपेक्षित असलेले स्वराज्य स्वकर्तृत्वावर निर्माण करा आणि राजकीय मोगलाईतून महाराष्ट्राची मुक्तता करा. मार्ग कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही.
महाराष्ट्रातून 6 जागा राज्यसभेसाठी निवडल्या जाणार आहेत. आमदारांच्या संख्येनुसार शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाची प्रत्येकी एक तर भाजपच्या दोन जागा सहज निवडून येणार आहेत. त्यामुळे सहाव्या जागेसाठी मोठी चुरस होणार आहे. संभाजीराजे यांनी आपण सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असल्याने सर्व पक्षांनी आपल्याला मतदान करावे असे आवाहन केले. त्यांच्या या आव्हानाला कोणत्याही पक्षाने म्हणावा तसा सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. यापूर्वी त्यांनी एकदा राष्ट्रवादी तर दुसर्यांदा भाजपचा हात धरल्याने कोणताही पक्ष अपक्ष उमेदवार म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही. शिवसेनेला त्यांच्या हातात शिवबंधन बांधायचे होते. परंतु आतापर्यंतच्या राजकीय पक्षांच्या अनुभवावरून त्यांना कोणत्याही पक्षाच्या ध्येयधोरणाला जखडून राहायचे नाही. त्यामुळे त्यांनी शिवबंधन झुगारून अपक्ष उमेदवार लढण्याचे निश्चित केले आहे. खरंतर हा आत्मघातकी निर्णय म्हणावा लागेल. परंतु या निर्णयामुळे ज्या पक्षाने शिवरायांचे नाव घेऊन आजवर राजकीय पोळीवर मतांचे तूप ओरपून सत्तेचे राजकारण केले त्यांचे छत्रपतींवरील बेगडी प्रेम या निवडणुकीत उघडे होणार आहे. त्याचा फायदा भाजप निश्चितच घेईल आणि पुढील सर्व निवडणूकात मराठी समाजातील त्या पक्षाची प्रतिमा निश्चितच मलीन करेल. महाविकास आघाडी व भाजपने सामंजस्यपणे मनाचा मोठेपणा दाखवत ही निवडणूक बिनविरोध करू शकले असते. शिवसेनेला कोंडीत पकडण्याची संधी यातून भाजपला दिसल्याने त्यांनी हा चेंडू सेनेच्या कोर्टात टाकला. त्याला टोलवण्याच्या नादात सेनेनेही लागोलाग कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देऊन स्वतः त्रिफळाचीत झाले. त्यामुळे या निवडणुकीचे दूरगामी राजकीय पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर पडणार आहेत.
कोल्हापूर संस्थानाची धुरा सांभाळणार्या शाहू महाराजांचे संभाजी राजे दुसरे चिरंजीव आहेत. त्यांचे शिक्षण कोल्हापूर आणि राजकोट येथे झाले आहे. संयमी आणि अभ्यासू वृत्तीने व्यक्त होणे ही त्यांची जमेची बाजू मानली जाते आहे. याउलट उदयनराजे भोसले हे तापट आणि शीघ्रकोपी म्हणून ओळखले जातात. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यांना त्यात यश आले नाही. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपुर्वी मराठा समाजाला दिलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केले होते. महाराष्ट्रात मराठा आंदोलनाचा वणवा पेटण्याची शक्यता होती. परंतु संभाजीराजे यांनी सामोपचाराची भूमिका घेऊन मराठा समाजातील जाणकार विद्वान वकिलांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवण्याचे निश्चित केले. त्यामुळे ज्या लोकांनी या आरक्षणाला विरोध करून महाराष्ट्र धगधगत ठेवण्याचे स्वप्न पाहिले त्यांना मोठी चपराक त्यांनी दिली. संभाजीराजे बर्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले असून त्या माध्यमातून त्यांनी मोठे संघटन उभे केले आहे. राज्यात 27 टक्के मराठा समाज असून 40 टक्के बहुजन समाज आहे. एकूण 67 टक्के बहुजन समाजाच्या आरक्षणाचा हा जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे. छत्रपतींनी ज्याप्रमाणे बहुजन समाजाच्या सामर्थ्यावर ‘स्वराज्य’ उभारले त्याच बहुजन समाजाला पुन्हा त्यांच्या न्याय हक्कासाठी संभाजीराजांना एकत्रित आणावे लागेल. पण त्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दारात जायची आवश्यकता नसून जनतेच्या दारात जाऊन प्रेम आणि आपुलकीच्या जोरावर विश्वास संपादन करावा लागेल.
भाजपा हा आरक्षणाच्या बाजूने नसल्याचे सिद्ध झाले आहे. मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यायचा तर दुसरीकडे काही जणांना न्यायालयात पाठवून आरक्षण रोखायचे अशी दुटप्पी भूमिका घेणार्यांच्या सोबत गेल्याचा पश्चाताप राजेंना होत असेल. एकटा माणूस स्वतःच्या ठाम विचारावर सत्ता मिळवू शकतो हे केजरीवाल यांनी देशाला दाखवून दिले. तोच मार्ग राजे यांनी चोखाळावा. महाराष्ट्राला वसुली व भ्रष्टाचारातुन मुक्त करण्याच्या दिशेने समविचारी पक्षाला सोबत घेऊन कोल्हापूर महापालिका जिंकावी व स्वराज्याचे तोरण बांधून महाराज्यांच्या विचारांशी बांधिलकी जपणारा पक्ष अस्तित्वात आणावा. त्यासाठी राजासारखेच रहा राजे....
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai