Breaking News
एखाद्याला अजीर्ण झाले किंवा शौचास साफ होत नसेल तर पाटणकर काढा दिला जातो. गेली अडीच वर्ष महाराष्ट्रात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपने अनेक प्रयत्न केले. यावेळी त्यांनी त्यासाठी पाटणकर काढ्याच्या मात्रेचा योग्य वापर केला आणि 50 आमदारांना सत्तेची ढळढळ लागल्याने हे सरकार पाडले. एवढेच नव्हे तर या सेनेतील बंडखोर नेता एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करून अति ढळढळीने दुखत असलेल्या जागेवर मलम लावण्याऐवजी मीठ चोळले. दरबारी राजकारणाचा अनुभव असलेले उद्धव ठाकरे मात्र या मैदानी राजकारणात हतबल झालेले दिसले. वास्तविक पाहता त्यांच्या पाठीमागे काँग्रेस-राष्ट्रवादी मधील दिग्गज नेत्यांची फौज मार्गदर्शनासाठी असताना अनिल परब, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर आणि बोलघेवडा संजय राऊत यांसारखे साडेतीन शहाणे यांच्या बुद्धिमत्तेवर ते अवलंबून राहिले. त्यामुळे शेवटी जे होऊ नये ते झाले आणि आता ‘तेलही गेले तूपही गेले, हाती आले धोपाटणे’ अशी अवस्था उद्धव ठाकरे यांची झाली आहे. राजकारणात पक्षप्रमुख कसा नसावा याचे उत्तम उदाहरण म्हणून यापुढे उद्धव ठाकरे यांचे नाव प्रामुख्याने घेतली जाईल.
सरकार पाडण्यासाठी अनेक प्रयत्न भाजपकडून गेले अडीच वर्ष सुरू होते. सुरुवातीला सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियान यांच्या मृत्यूचे भांडवल करून सरकारला घाबरवण्याचा प्रयत्न झाला. बदनामीचे अस्त्र वापरूनही ठाकरे या आघाडीतून बाहेर पडत नाही याचा अंदाज आल्यावर आपल्या अखत्यारीतील ईडी नावाचे ब्रह्मास्त्र बाहेर काढले. त्याचा पहिला प्रहार गृहमंत्री अनिल देशमुख व नवाब मलिक यांच्यावर केला. अजूनही उद्धव ठाकरे बिथरत नाहीत हे दिसल्यावर त्यांचे मेहुणे पाटणकर यांना लक्ष करून त्यांची संपत्ती ईडी मार्फत जप्त केली. मेहुण्यावरील कारवाईने उद्धव ठाकरे घाबरतील आणि सरकार पडेल अशा अपेक्षेत असलेल्या भाजपचा भ्रमनिरास झाला. परंतु पाटणकरांवरील कारवाईचे पडसाद ठाकरे यांच्या घरात उमटत होते. शिवसेना ही रश्मी ठाकरे यांच्याकडून चालवली जाते असा समज बहुतांश लोकांचा आहे. त्यामुळे या बंडामागे ईडीच्या पाटणकर मात्रेचा तर प्रभाव नाही ना अशी शंका राजकीय वर्तुळात आहे.
भाजपाला हिंदुत्व विचार पसरवणारा दुसरा कोणताही पक्ष देशात नको. त्यामुळे लवकरात लवकर शिवसेना संपुष्टात आणणे हि भाजपची प्राथमिकता आहे. त्यासाठी शिवसेनेतील दुसर्या फळीचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी पाटणकर काढ्याची मात्रा वापरली. त्यांचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे सचिन जोशी यांच्यावर ईडीची नोटीस पाठवली व ही मात्रा तंतोतंत लागू पडली. रिक्षा चालक म्हणून आयुष्याची सुरुवात करून सेनेत असताना कमावलेली शेकडो कोटींची मालमत्ता जप्त होण्याच्या भीतीने शिंदे यांनी बंडाचे हत्यार उपसले. एकनाथ शिंदे बोलत असलेले बाळासाहेबांचे हिंदुत्व, निष्ठा या सगळ्या बाबी सत्ता आणि संपत्ती पुढे गौण आहेत. पाणी नाकापर्यंत आले तर माकडीनही मुलाला पायाखाली घेते तसे शिंदे यांचे झाले आहे. आयुष्यभर ज्या शिवसेनेत ते वाढले, अनेक सत्तापदे भोगली, बाळासाहेब, धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेत राजकारण केले त्यांच्याच पक्षाच्या गळ्याला नख लावण्याचे पातक भाजपच्या सांगण्यावरून करत आहेत. शिंदे यांची बंडाळी उद्धव ठाकरे कशा पद्धतीने हाताळतात यावर शिवसेनेचे पुढील भवितव्य अवलंबून आहे. शिंदे यांनी मिळवलेले मुख्यमंत्रीपद औटघटकेचे आहे त्याची जाणीव त्यांनाही आहे, परंतु या औटघटकेच्या मोहापायी ते सेनेला किती नुकसान करतात हे पाहणे औस्तुुक्याचे ठरणार आहे.
विधान परिषदेतील निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या बावीस समर्थक आमदारांना घेऊन सुरतला प्रयाण केले. वास्तविक पाहता त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी उर्वरित आमदारांना एकत्र ठेवून त्यांच्या सभोवताली राज्याचे पोलीस आणि शिवसैनिकांचा जागता पहारा देणे गरजेचे होते. यापैकी कोणतेही कर्तव्य पार न पाडता ते या ‘चिमण्यांनो परत फिरा रे’ असे आर्जव बंडखोरांना फेसबुकच्या माध्यमातून करत राहिले. दररोज एक-दोन आमदार चार्टर विमानातून सुरत मार्गे गुवाहटीला जात असल्याचे महाराष्ट्राने पाहिले. उद्धव यांची हि हतबलता पाहून या बंडामागे त्यांचाच हात तर नाही ना अशी शंका सर्वांना आली. हे बंड थांबवण्याचा किंवा त्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी मोठ्या धैर्याने केला. परंतु अवसानघातकी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रयत्नांवर आपल्या राजीनाम्याने पाणी फेरले. त्यांच्या या अवसानघातकी निर्णयाची कोणती किंमत चुकवावी लागेल हे भविष्यात स्पष्ट होईल.
आपण राजीनामा दिला म्हणजे सर्व सुरळीत होईल या भ्रमात ठाकरे यांनी स्वतः बरोबरच पक्षालाही अडचणीत आणले आहे. ज्यावेळी विश्वासदर्शक ठराव मंजुरीसाठी विधानसभेच्या पटलावर येईल त्यावेळी भाजपाने निवडलेले विधानसभा अध्यक्ष सांगतील तोच पक्षप्रतोद असेल आणि त्याने काढलेल्या व्हीपवर आदित्य ठाकरेसह उर्वरित आमदारांना शिंदेना मतदान करावे लागेल. हा व्हीप नाकारला तर आदित्यसह इतर सोळा आमदारांना अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे शिंदे यांचा पक्षावरील दावा सांगण्याचा मार्ग थोडासा सुकर झाला आहे. याउलट उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून विश्वासदर्शक ठराव मांडला असता तर झीरवळ सभापती राहिल्याने त्यांना शिंदे गटाला अपात्र करणे सहज शक्य होते आणि शिवसेना पुढील कायदेशीर लढाईतून वाचली असती. परंतु तडजोडी व्यतिरिक्त कोणताही अनुभव नसलेल्या देसाई, परब, राऊत आणि नार्वेकर चौकटीवर अवलंबून राहिल्याने त्यांनी स्वतःसह, आदित्य आणि पक्षाचे राजकीय भवितव्य अंधकारमय केले आहे. शिंदेना मुंबई महापालिकेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री बनवले आहे. इप्सित साध्य झालं की शिंदे यांनाही जावे लागेल कारण तोपर्यंत लागणार्या रसदेची तरतूद भाजपने केलेली असेल. महाराष्ट्रातील दिग्गज राजकारणी स्वतःच्या मेहनतीने इथपर्यंत पोहचले आहेत, शिवसैनिकांच्या घामातून, मेहनतीतुन आयत्या मिळालेल्या सत्तेतून नेत्यांनी अजीर्ण होईपर्यंत कमावलेल्या संपत्तीला पाटणकर काढ्याची मात्रा आवश्यक होतीच, ती मात्र यावेळी ईडीने दिली इतकेच...
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे