ई-गव्हर्नन्स सुधारणा उपक्रमात पनवेल पालिकेचा झेंडा
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 03, 2026
- 18
पनवेल : 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचा प्रशस्तीपत्र प्रदान समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी प्लस उपक्रमात पनवेल महानगरपालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत मानाचा बहुमान मिळविल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
राज्यातल्या एकूण 29 महानगरपालिकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता. अनेक मोठ्या व अनुभवी महानगरपालिका स्पर्धेत असताना पनवेल महापालिकेने आपला झेंडा फडकवला असून याबाबत पनवेलचे विशेष कौतुक होत आहे. पनवेल पालिकेने यापूर्वीही 100 दिवसांचा प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमामध्ये चांगली कामगिरी बजावत तिसरा क्रमांक पटकावला होता. 150 दिवसांच्या इ गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामधे महापालिकेचे संकेतस्थळ वापरण्यास सुलभ, सुरक्षित, अद्ययावत असणे; महानगरपालिकेचे डॅशबोर्ड विकसित करणे; आपले सरकार अंतर्गत नागरिकांना विहित वेळेत सुलभतेने सेवा पुरवणे; कार्यालयात ई-ऑफिस चा प्रभावी वापर करणे; व्हॉटसऑप चॅटबोटचा वापर करण, एआय चा वापर करणे, जीआयएसचा वापर करणे अश्या घटकांचा समावेश होता. आयुक्त मंगेश चितळे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यावर लगेचच कार्यालयात ई-ऑफिस सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे आयुक्तांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या पनवेल कनेक्ट ॲपद्वारे नागरिकांना सुलभ सेवा प्रदान करता आल्या. याचा मोठ्या प्रमाणात फायदा या स्पर्धेसाठी झाला. कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींच्या सुधारणांकरीता 150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रमामध्ये संपूर्ण राज्यातून 29 महापालिकांचा सहभाग होता. या सर्व पालिकांमधून एकच क्रमांक काढण्यात आला असून तो पनवेल महापालिकेने पटकाविला. सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याकरीता सेवाविषयक बाबींच्या गुणांकनाचा सेवाकर्मी कार्यक्रमामध्ये आकृतिबंध मंजूर असणे, सेवाप्रवेश नियम मंजूर असणे, सेवाज्येष्ठता अद्ययावत करून प्रसिद्ध करणे, पदोन्नती पदांची स्थिती, सरळसेवा पदांची स्थिती, बिंदुनामवाली प्रमाणित असणे, अनुकंपा नियुक्त्या, रजिस्ट्रेशन व प्रशिक्षण, सेवापुस्तक अद्ययावत करणे अश्या नऊ मुद्द्यांवर आधारित मूल्यांकन झाले होते. यामध्ये 100 पैकी 96 गुण घेऊन पनवेल महानगरपालिकेने बाजी मारली आहे.
तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांच्या दूरदृष्टीने त्यावेळी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्याचा विशेष फायदा या स्पर्धेसाठी झाला. आयुक्त मंगेश चितळे यांनी आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी जसे की सेवाजेष्ठता यादी, आश्वासित प्रगती योजना राबविणे, पदोन्नती देणे व भरती प्रक्रिया पार पाडणे यास प्राधान्य दिले. अशा बाबींमुळे सेवाकर्मी स्पर्धेत फायदा झाला. सदर घटकांचे सादरीकरण 10 जानेवारी रोजी महानगरपालिकेने सादर केले होते. या स्पर्धेचे मूल्यांकन क्वालिटी काऊंन्सिल ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्थेने पारदर्शक पणे केले होते.
पुरस्कार प्रशस्तीपत्र वितरण समारंभावेळी प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या कार्यालय प्रमुखांना कार्याचे सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली होती. यावेळी पनवेल महापालिकेने केलेल्या सादरीकरणाची उपस्थितांनी प्रशंसा केली. तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांची प्रेरणा व आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या नेतृत्वाखाली संगणक विभागप्रमुख वर्षा पालवे, दिशा टाक व कर्मचारी यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली.
पनवेल महापालिकेने मिळवलेले हे यश हे केवळ क्रमांकापुरते मर्यादित नसून प्रशासनातील पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिकाभिमुख सेवांचा परिणाम आहे. या यशामागे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समन्वय, परिश्रम आणि बांधिलकी आहे. भविष्यातही याच दिशेने अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पनवेल महानगरपालिका राज्यात आदर्श ठरेल, असा मला विश्वास आहे. -आयुक्त मंगेश चितळे
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai