Breaking News
उरण : येथील म्हातवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत आणि उरण ओएनजीसी प्रकल्पालगत नागरी वस्तीत आरएमसी प्लान्ट उभारण्यात आला आहे. त्यामुळे या प्लान्टमुळे परिसरात उडणाऱ्या धुळीमुळे नागाव, म्हातवली या दोन्ही ग्रामपंचायतीमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी यांच्याकडून तपासणी करून कारवाई करण्याचे संकेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत.
पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून हजारो नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक बनलेल्या आरएमसी प्लांटवर कारवाई करण्याची मागणी नागाव-म्हातवली मधील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. नागाव-म्हातवली ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू पाहाणाऱ्या या आरएमसी प्लांट सुरू करण्यासाठी म्हातवली ग्रामपंचायतीने ना-हरकत प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती म्हातवली ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी ज्योती फोफेरकर यांनी दिली. तसेच येथील विहिरी संदर्भात नागाव आणि म्हातवली या दोन्ही ग्रामपंचायतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या आरएमसी प्लांटमध्ये दोन व तीन नंबरची खडी, ग्रीटसॅण्ड बनविण्यात येत आहे. खडी, ग्रीटसॅण्ड बनविताना नागाव- म्हातवली ग्रामपंचायतीच्या परिसरात धुळीचे लोट उठतात. परिसरात पसरणारे धुळीचे साम्राज्य आणि कर्णकर्कश आवाजामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याआधीच ओएनजीसीच्या प्रकल्पाच्या वाढत्या हवेतील प्रदूषणामुळे याआधीच परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. त्यामध्ये आता नव्याने सुरू झालेल्या आरएमसी प्लांटची भर पडली आहे. दरम्यान या प्लान्टची तातडीने तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.
म्हातवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेला आरएमसी प्लांट कायदेशीर की बेकायदेशीर आहे याची प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी यांच्या कडून तपासणी करून त्यांच्या अहवाला नंतर कारवाई करु अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी विक्रांत भालेराव यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai