Breaking News
मंत्री नितेश राणे यांची ग्वाही
उरण ः मस्यव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्याबद्दल कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा शुक्रवारी (दि. 23) करंजा येथे जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी त्यांनी मच्छिमार बांधवांसोबत संवाद साधला. शेतकऱ्यांना ज्या ज्या सवलती आतापर्यंत मिळत होत्या त्या सर्वच्या सर्व सवलती मच्छीमार बांधवांना मिळणार आहेत. या अनुषंगाने शंभर टक्के पूर्तता होण्यासाठी मी व माझे खाते प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी दिली. ते करंजा येथील सभेत बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने पहिल्या शंभर दिवसात मस्यव्यवसायाला कृषी दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती आता मच्छिमारांनाही मिळणार असून यामुळे त्यांच्या आयुष्यात बदल घडणार असल्याचे मंत्री नितेश राणे म्हणालेे. वीज दरात सवलत, किसान क्रेडिट कार्डचा लाभ, मासेमारी साहित्य सवलतीच्या दरात मिळेल तसेच वादळ किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती आल्यास मदत मिळणार आहे.करंजा हे देशातील एक नंबरचे बंदर ठरेल व महाराष्ट्राच्या विकासात भर टाकेल, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला. या वेळी त्यांनी, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी हे समाजातील सर्व घटकांच्या हितासाठी झटत असतात, अशा शब्दांत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, आज अनेक महत्त्वाचे प्रकल्प पनवेल आणि उरण तालुक्याच्या अवतीभोवती आले आहेत. पनवेलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ दोन ते तीन महिन्यांत सुरू होणार आहे. अटल सेतू हा महाराष्ट्रासह देशाला अभिमान वाटावा असा प्रकल्प उरण तालुक्यात आला. त्यामुळे रायगड जिल्हा मुंबईशी थेट जोडला गेला. या माध्यमातून येथील विकासाला चालना मिळाली आहे.
आमदार महेश बालदी यांनी मच्छीमार बांधवांच्या समस्या अधोरेखित केल्या. करंजा बंदराचे उर्वरित काम पूर्ण होणे बाकी आहे. ते माग लागावे. मोरा, नवापाडा येथील मच्छीमारांना मोबदला मिळावा. रेवस-करंजा ब्रिजमध्ये बाधित होणाऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. सर्व मच्छीमारांना डिझेल परतावा मिळावा तसेच छोटी बंदरे, पकटी निर्माण कराव्यात याकडे त्यांनी मंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले. या कार्यक्रम प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी व इतर मान्यवरांनीही विचार मांडले. करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन प्रदीप नाखवा यांनी प्रास्ताविक केले. उरण मधील विविध सामाजिक संस्था संघटना तर्फे उरण मधील विविध समस्या संदर्भात मंत्री नितेश राणे यांना निवेदन देण्यात आले. समस्या सोडविण्याचे नितेश राणे यांनी आश्वासन दिले. एकंदरीत सदर कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai